हिमायतनगर(अनिल मादसवार)वाढोणा शहराच्या पश्चिमेस हाकेच्या अंतरावर निसर्गनिर्मित्त पांडवकालीन युगातील कनकेश्वर तलाव आहे. त्या काळात हस्तिनापुरच्या कुरुक्षेत्रात झालेल्या युद्धानंतर कौरवांपासून स्वतःला वाचविण्यासाठी पांडवानी वारणावती येथील याच तलावानजीक मंदिरात वास्तव्य केले होते. त्याकाळी सध्याच्या हिमायतनगर शहराचे नाव वारणावती होते, पांडवानी या तलावाला ओमचा आकार दिला. तर द्रोपदीने तलावात शुभ्र कमळाचे फुलं लाऊन मंदिर परिसराला सजविल्याची अख्याइका सांगितली जाते. त्यामुळे येथील वरद विनायकाचे हे मंदिर चंद्राच्या बिम्बावर वसलेले आहे. कालांतराने ये ठिकाणी गौंड राज्याचे राज्य अस्तित्वात आले, त्या राजाने वारणावती शहराचे नाव बदलून वाढोणा तेवले. राजे शामबहादूर यांनी वाढोणा शहराला जिल्ह्याचा दर्जा दिला होता. ते याच ठिकाणी राहून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार पाहत शेतसारा वसूल करत असे. कालांतराने निजामशाही राजवटी सुरु झाली. त्या काळात हिमायतअली नावाचा सरदार वाढोणा जिल्ह्याला भेट देण्यासाठी आला होता. सर्व जाती - धर्माच्या लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावर खुश होऊन हिमायतअली राजाने हिंदू - मुस्लिम समाजासाठी शेतीच्या स्वरूपात भव्य नजराणा बहाल केला. सरदारच्या या उपकाराची परतफेड म्हणून हिमायतअली नावाचे नामांतर करून वाढोणा शहराला हिमायतनगर नाव देण्यात आले. तेंव्हाच वाढोणा आज हिमायतनगर नावाने ओळखले जाते आहे.
निजामाच्या राजवटीत येथील शिवमंदिरासह अन्य मंदिराची सुरक्षा धोक्यात आली होती. त्या पासून मूर्तीचे रक्षण करण्यासठी येथील काही लोकांनी वरद विनायकाची मूर्ती लिंबाच्या झाडा खालील कंबरे इतक्या खोल खड्यात जपून ठेवली होती. तीच वरद विनायकाची मूर्ती तब्बल दीडशे वर्षानंतर याच अवस्थेत उन, वारा, पावसाचा अनुभव घेत राहिली. १९७८ ला तत्कालीन अवतारी पुरुष श्री संत पाचलेगावकर महाराज यांनी भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने कनकेश्वर तलावासह मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. त्यावेळी गावातील गणेशभक्त व परिसरातील शेतकर्यांनी श्रमदान केले. त्या वेळी केलेला संकल्प पूर्ण करण्यासठी २५ वर्षानंतर नांदेड जिल्हा परिषदेचे तत्कालीन बांधकाम सभापती श्री प्रताप देशमुख सरसमकर यांच्या सहकार्याने गुरुवर्य लाखने महाराज, कांतागुरु आजेगावकर, यांच्या पुढाकारातून मंदिर बांधकामाची सुरुवात करण्यात आली. यासाठी येथील छत्रपती शिवाजी गणेश मंडळाच्या युवकांनी गणेशोत्सव काळात केला जाणारा अनधिक्रुत खर्च टाळून उर्वरित रक्कम व लोकवर्गणीतून व मजुरीचे पैसे वाचवत वरद विनायकाचे मंदिर उभे केले. उंच टेकडीवरील मंदिरात इच्छापूर्ती वरद विनायकाची विशाल मूर्ती मोठ्या कसोटीने नेण्यात येउन, विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. आज हि मूर्ती सर्वाना आशीर्वाद देत असून, गणेश उत्सव पर्व काळात या ठिकाणी गणेश मूर्तीची पूजा- अर्चना महाभिषेक, महाप्रसादाच्या पंगती केल्या जातात. विनायकाच्या दर्शनाने अनेकांच्या इच्छा पूर्ण झाल्याचे अनुभव भक्त सांगतात.
येथील ओम आकराच्या कनकेश्वर तलावाच्या चंद्राच्या बिम्बावर नवसाला पावणाऱ्या इच्छापूर्ती श्री वरद विनायकाचे मंदिर आधुनिक स्वरूपात उभे आहे. यात विराजमान झालेली अष्ठभूजाधारी श्री वरद विनायकाची मूर्ती हि प्राचीन कालीन आहे. मंदिराचा गर्भगृह, समोरील प्रांगण, आणि गर्भग्रहा भोवति प्रदक्षिणापथ असे उंच टेकडीवरील मंदिराचे स्वरूप आहे. दर महिन्याची अंगारिका, गणेश, संकष्ठ चतुर्थी, श्रावण मास व गणेशोत्सवाच्या पर्व काळात विदर्भ - मराठवाड्यातील हजारो भाविक - भक्त दर्शनासाठी तोबा गर्दी करतात. शनिवारच्या संकष्ट चतुर्थी दिनी शहरासह विदर्भ- मराठवाड्या तील हजारो भक्त श्री वरद विनायक दर्शनसाठी गर्दी करतात.
या तलावात पावसाच्या जमा झालेले पाण्यात जिवंत पांढर्या कमळाचे अस्तित्व आहे, परंतु पावसा अभावी हे तलाव या वर्षी कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे निसर्गरम्य तलावातील दृश लोप पावल्याने गणेश दर्शनसाठी येणाऱ्या भक्तांना मोहित करणारा मंदिर परिसराच्या नयनरम्य देखाव्य पासून वंचित राहावे लागणार आहे. कायमरूपी निसर्गसौंदर्य टिकवून ठेवण्यासठी पर्यटन विकास महामंडळाने श्रीक्षेत्र दर्जा असलेल्या हिमायतनगर शहरातील वरद विनायक मंदिर व पांडवकालीन तलावाचा विकास करून अस्तित्व टिकून ठेवावे अशी रास्त मागणी गणेश भक्तांमधून होत आहे.