माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करणाऱ्या 23 खंडणी बहाद्दरांवर गुन्हे दाखल -NNL

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी ठरले कर्दनकाळ


कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशातून विविध प्रकारचे कायदे तयार करण्यात येतात तसेच त्याची अंमलबजावणी करत असताना जनतेला तसेच समाजाला त्याचा फायदा व्हावा हा एकमात्र उद्देश त्यामागे असतो .परंतु काही खंडणी बहाद्दर त्या कायद्याचा कसा दुरुपयोग करतात याची उकल करण्यावर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 

नांदेड परिक्षेत्रांतर्गत गेल्या सहा महिन्यात अशा 23 खंडणी बहाद्दरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक गुन्हे नांदेड जिल्ह्यात दाखल झाले आहेत तर हिंगोली ,लातूर व परभणी जिल्ह्यातही अशाच प्रकारे माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या खंडणी बहाद्दरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या ज्या ज्या खंडणीबहाद्दरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना न्यायालयातर्फे पाच ते सात वर्षांची शिक्षा देखील होऊ शकते अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये देखील आहे.

मागील वर्षी ऐन दिवाळीच्या काळात खंडणी बहाद्दरांनी माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करत काही व्यापाऱ्यांना खंडणी मागितली होती. खंडणी बहाद्दरांनी माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून स्वतःचे खिसे भरण्याचा प्रयत्न केला होता. अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी अशा खंडणी बहाद्दरांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली. या लोकांनी ज्यांना ज्यांना माहिती अधिकार कायदा अंतर्गत अर्ज करून खंडणी मागितली अशांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत केवळ नांदेड शहरातीलच नव्हे तर मुंबईतील मंत्रालयापर्यंत या कायद्याच्या आधारे खंडणी मागणाऱ्या बहाद्दरांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले. या खंडणी बहाद्दरांनी ज्या ज्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्याकडून खंडणी उकळली अशा अधिकाऱ्यांना एकत्र जमवून त्यांच्या फिर्यादीवरून खंडणी बहाद्दरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. एवढेच नव्हे तर नांदेड शहरात ज्या खंडणीबहादरांनी या प्रकारे अर्ज दाखल करून खंडणी उकळण्याचा सपाटा लावला होता अशांना कायद्याचा जरब बसविला. 

नांदेड परिक्षेत्र अंतर्गत नांदेड परभणी लातूर हिंगोली या जिल्ह्यातील सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच इतर अधिकाऱ्यांना या संदर्भात तक्रारी आल्याबरोबर त्याची शहानिशा करून गुन्हे दाखल करण्यात यावेत. असे स्पष्ट आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी दिले. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत असे काही आरोपी पोलिसांच्या हाती लागले ज्यांच्या विरुद्ध एक नव्हे तर दहा ते पंधरा गुन्हे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आले. असाच एक प्रकार गेल्या आठ दिवसापूर्वीच देगलूर येथे उघडकीस आला. दोन जणांविरुद्ध दहा अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकरणात तक्रार दिल्यानंतर देगलूर पोलीस स्थानकात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकापाठोपाठ आठ ते दहा गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेणाऱ्या व पांढरपेशी गुन्हेगारांनी माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर केल्यास त्यांना कशाप्रकारे दंडुक्याचा प्रसाद मिळतो हे देखील विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी करून दाखविले आहे. 

नांदेड परिक्षेत्र अंतर्गत विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी आता माहिती अधिकार कायदा अंतर्गत खंडणी मागणाऱ्या लोकांना शोधून काढण्याची विशेष मोहीम सुरू केली आहे. अलीकडेच एका माहिती अधिकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपीच्या घरी पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली असता त्याच्या घरातून १०० पेक्षा अधिक आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सांगितले. माहिती अधिकार कायदा अंतर्गत विविध खात्याच्या अधिकाऱ्यांना असे खंडणी बहाद्दर ब्लॅकमेल करत असतात ते अधिकारी व कर्मचारी देखील स्वतःच्या खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठली कारवाई होईल या भीतीने अशा खंडणीबहाद्दरांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. परंतु अशा प्रकारे खंडणी बहाद्दरांना घाबरून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मागे राहू नये त्यांना पोलीस खात्यातर्फे पाठबळ मिळेल त्यांना योग्य ती माहिती व सहकार्य मिळेल. त्यामुळे त्यांनी आमच्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित पोलीस स्थानकात तक्रार द्यावी जेणेकरून अशा खंडणी बहाद्दरांना अद्दल घडविण्यात येईल असेही विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सांगितले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील ज्या वीस खंडणी बहाद्दरांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यापैकी काहींना पोलीस सुरक्षा होती तसेच काही आरोपींकडे शस्त्र देखील होते. त्यांची पोलीस सुरक्षा काढण्यात आली एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे असलेले शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहेत. त्यांचा शस्त्र परवाना रद्द व्हावा असा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या आरोपींविरुद्ध न्यायालयात सबळ पुरावे देखील दाखल करण्यात आले आहेत. अशा आरोपींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे व त्यांच्याविरुद्ध कारवाई नक्कीच होईल एवढेच नव्हे तर पाच ते सात वर्षांची शिक्षा देखील अशा खंडणी बहाद्दरांना होऊ शकेल. असा विश्वासही विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी व्यक्त केला. माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करणाऱ्या काही खंडणीबहाद्दरांनी स्वतःला वाचविण्यासाठी तसेच स्वतः दोषी नसल्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका देखील दाखल केली होती परंतु खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळून लावली. 

माहिती अधिकार कायदा अंतर्गत खंडणी मागणाऱ्या अशा प्रवीण विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची विशेष मोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रात, मराठवाड्यात नांदेड परिक्षेत्र अंतर्गत झालेली ही कारवाई राज्याचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. या प्रकरणात ज्या ज्या आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन कारवाई होत असताना जास्तीत जास्त शिक्षा त्यांना व्हावी या दृष्टीकोनातून विशेष मोहीम देखील सुरू करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. माहिती अधिकार कायद्याचे पांघरून वापरून समाजातील अधिकारी कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या खंडणी बहाद्दरांना आपण चांगलाच धडा शिकविणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोणाकडेही खंडणी मागत असल्यास त्यांनी पोलीस स्थानकात संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यात अशा खंडणी बहाद्दरांविरुद्ध  तक्रारी देण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे पोलीस अधिकारी अशा खंडणी बहाद्दरांना वठणीवर आणणार आहेत.

......लेखक : अभयकुमार दांडगे, जेष्ठ पत्रकार, नांदेड.

1 Comments

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी