नांदेड| सर्वोच्च न्यायालयानं बांठिया आयोगाचा अहवाल मान्य करुन त्यानुसार स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तत्काळ घेण्याचा दिलेला आदेश हा राज्यातील ओबीसी बांधवांच्या हक्कांचा आणि ओबीसींच्या हक्कांसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय आहे, अशा शब्दात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मुख्य प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा अध्यक्ष श्री शंकरराव नांदेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
आज ओबीसी आरक्षणासाठीची लढाई यशस्वी करुन दाखवली. त्या काळात राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या राज्यात ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला. ते आरक्षण अबाधित राहिलं, याचा आनंद आहे.ओबीसी आरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्याचं काम आधीपासून आम्ही केलं. हीच भूमिका यापुढेही कायम राहील. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी दिलेला मानवतेचा, सामाजिक न्यायाचा विचार महाराष्ट्रात सदैव जिवंत राहील, हा विश्वास सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयातून पुन्हा एकदा दृढ झाला आहे.
ओबीसींच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय व सुरु केलेल्या योजना यापुढेही सुरु राहतील, याची काळजी आम्ही निश्चित घेऊ. ओबीसी बांधवांच्या एकजुटीतून तसंच संपूर्ण महाराष्ट्रानं ओबीसी आरक्षणाला दिलेल्या एकमुखी पाठिंब्याच्या बळावर हे यश मिळालं आहे. असे उदगार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मुख्य प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा अध्यक्ष श्री शंकरराव नांदेडकर यांनी केले.