नांदेड| महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नांदेड केंद्रावर नवव्या दिवशी रहस्यमय, गूढ कथा असलेलं “दानव” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले. अतुल साळवे लिखित, दिग्दर्शित दानव या नाटकाने रसिक प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले. बालाजी दामुके निर्मित, गोपला फौंडेशन परभणीच्या वतीने सादर झालेलं हे नाटक त्रांत्रिक बाबतीत खूप सक्षम ठरले.
दानव या नाटकात लेखकाने मानवी मुलभूत भावनांचा त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात घडणार्या घटनांच्या माध्यमातून वेध घेतला आहे. मुळात या नाटकाची सुरवात एका गूढ अशा अनाकलनीय प्रसंगाने सुरु होते आणि पुढे सतत प्रेक्षक त्याच मनोभूमिकेतून अखंड वाहत जातो. एका विशिष्ठ वातावरणाच्या परिक्षेत्रात सुरु होणारा नाट्यप्रवास मानवी मनोर्यांच्या नानाविध पेलुंसह नाटकाच्या शेवटाकडे प्रवाहित होतो. ज्यातून लेखकाने अगदी सामान्य वाटणार्या व्याक्तीरेखांच्या आत दडलेल्या दानवी प्रवृत्ती अत्यंत प्रभावीपणे रेखाटल्या आहेत.
या नाटकात माधुरी लोकरे यांनी साकारलेली शनयाची भूमिका आणि सुनंदा डीघोलकर यांनी साकारलेली चांडाली प्रेक्षकांची दाद मिळवून जाते. तर अतुल साळवे यांनी साकारलेला भैरव लक्षवेधी ठरतो. कार्तिक खरे यांनी अथर्व च्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला तर रणजीत आगळे, आदर्श कवळीकर, हरिभाऊ कदम, गोविंद मोरे यांनी आप आपली भूमिका साकारली.
या नाटकाची तांत्रिक बाजू सक्षम होती नाराय त्यारे आणि साक्षी त्यारे यांनी साकारलेली प्रकाशयोजना नाटकाची उंची गाठते विशेष म्हणजे काही ठिकाणी फक्त प्रकाशयोजनेसाठी टाळ्या वाजल्या, असे क्वचितच घडते. दत्ता चव्हाण आणि सिद्धार्थ नागठाणकर यांनी साकारलेले नेपथ्य वास्तववादी स्वरूपाचे आशयानुरूप होते. बालाजी दामुके आणि साक्षी घोडेकर यांनी साकारलेली रंगभूषा. तेजस्विनी दामुके आणि मीरा घोडेकर यांनी साकारलेली वेशभूषा हे सर्व साजेस होत. दिनेश नरवाडे आणि योगेश गुंडाळे यांचे संगीत नाटकास पूर्णत्व प्राप्त करून देते. रंगमंच व्यवस्था – किरण डाके, विकास लाड, खालेद मामू, सोहम खिल्लारे यांनी सांभाळली. एकंदर स्पर्धेचा नववा दिवस इतर स्पर्धकांना हूड हुडी भरवणारा होता.