नांदेड (एनएनएल) रोपवाटिकेचा 54 हजार रुपयांचा किरायाचा धनादेश देण्यासाठी 25 हजाराची लाच घेणाऱ्या महिला वनपरिक्षेत्र अधिकारी आणि तिच्या नवऱ्याला जिल्हा न्यायाधीश एस.आर. जगताप यांनी काही अटींवर जामीन दिली आहे.
काल दि.26 जुलै रोजीच्या रात्री जांभळा ता.हदगाव या गावातील एका
व्यक्तीच्या जमिनीवर असलेल्या वन विभागाच्या रोपवाटिकेचे भाडे थकले होते. ती रक्कम 54 हजार 900 रुपये एवढी आहे. त्या रक्कमेचा धनादेश मिळावा यासाठी त्यांनी त्या विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शामला शिवाजी एखंडे पाटील यांच्याकडे मागणी केली तेंव्हा त्यांच्याकडे 25 हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली. ती लाच स्विकारताच पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेले शिवाजी एखंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्वरित अटक केली आणि शामला एखंडेला आज 27 जुलैच्या दुपारी अटक केली. दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी त्याना न्यायालयात आणले आणि पोलीस कोठडीची मागणी केली. ही मागणी न्यायाधीश जगताप फेटाळून लावली. त्यानंतर जामीन अर्ज आला आणि जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर दर सोमवार आणि गुरुवार सकाळी दहा ते बारा यावेळेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी, लाचलुचपत विभागाच्या परवानगीशिवाय नांदेड सोडून जायचे नाही या दोन अटींवर 15 हजार रुपयांच्या जामीनीवर मुक्त केले.
शाब्बासकी
जामीन अर्जावर सुनावणी होताना शामला एखंडे या न्यायालयात बसल्या होत्या. बाहेर त्यांचे बरेच नातलग आले होते. जामीन मंजूर होताच बाहेर आल्यावर अनेकांनी शामला एखंडे आणि शिवाजी एखंडे यांना शाब्बासकी दिली. यावरुन तेथे उपस्थित असणाऱ्या लोकांपैकी अनेकांनी सांगितले की, लाच घ्या आणि शाब्बासकी मिळवा. ही प्रतिक्रिया बोलकी आहे.काही लोकांनी सांगितले की हिमालयाची शिखरे सर करून आल्यानंतर जसा सत्कार होत असेल तसाच काहीसा प्रकार आज हे चित्र पाहून वाटत होते.