महसूलच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे पैनगंगा काठावरील पळसपूरच्या पेंडावरून रेती तस्करी जोरात
हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील पैनगंगा तीरावर असलेल्या पळसपूर घाटावरून वाळू माफियांकडून अवैद्य रित्या रेतीचे उत्खनन केले जात असून, तहसील प्रशासन मात्र याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करून शासनाचा लाखोचा महसुलावर पाणी फिरवत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून, परिणामी त्यांना विरोध करताना नदीकाठावरील नागरिकांना माफियांच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे.
विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठावर कामारी, दिघी, घारापुर, रेणापूर, पळसपूर, धानोरा, वारंग टाकळी, सरसम मासोबा नाला, यासह अन्य रेती घाट आहेत. मागील वर्षात यातील केवळ घारापुर, येथील रेती पेंडचा लिलाव प्रशासनाने केला असून, अन्य ठिकाणचे लिलाव अजूनही होणे बाकी आहे. परंतु प्रशासनाचे नियम डावलून लिलाव न झालेल्या रेती घाटावरून रेती तस्करांनी वाळू चोरीला सुरुवात केली असून, मुख्यत्वे पळसपूर पेंडावरून तस्करांकडून चार ते पाच ट्रेक्टर द्वारे मोठ्या प्रमाणात अवैद्य रित्या दिवस रात्र रेतीच्या उपसा केला जात आहे. परिणामी पर्यावरण धोक्यात आले असून, यामुळे महसुल प्रशासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविल्या जात आहे. हि बाब माहित असताना येथे कार्यरत तलाठी सुगावे, मंडळ अधिकारी सय्यद हे मात्र मुख्यालई न राहता नांदेडला राहून रेल्वे वेळापत्रकानुसार ये -जा करून, रेती तस्करांना अभय देत आहेत. नागरिकांच्या तक्रारी होताच कधीतरी मंडळ अधिकारी, तलाठी परिसरात फेफटका मारून रेती तस्करावर लहानशी कार्यवाही केल्याचे दाखून अर्थपूर्ण मैत्री करीत असल्याचा आरोप पळसपूर येथील जागरूक ग्रामस्थांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना केला आहे. त्यामुळेच येथे कार्यरत महसूल अधिकारी कर्मचारी मात्र महिन्याकाठी लाखोची माया जमवीत असल्याचे ग्रामस्थामधून बोलले जात आहे.
या संदर्भात तहसीलदार अरुण जराड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, अर्थपूर्ण संबंधाविषयी मला कसलीही माहिती नाही. यापूर्वी आलेल्या तक्रारीवरून मंडळ अधिकार्यांना सूचना दिल्या होत्या. तरी सुद्धा रेती तस्करी सुरु असल्याने ह्यापुढे मी स्वतः रेती घाटावर जाऊन रेती तस्करावर कार्यवाही करेन. जो कोणी अधिकारी रेती तस्करांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर सुद्धा कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठांना पाठविणार असल्याचे सांगितले.
याबाबत मंडळ अधिकारी सय्यद इस्माईल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, प्रत्यक्ष पेंडावर जाऊन रेती तस्करांची वाहने जप्त करून त्यांच्यावर पोलिस कार्यवाही केली जाईल.