हिमायतनगर। शहरातील नगरपंचायत कार्यालय ते राष्ट्रीय महामार्ग या रोडवर असलेल्या सोसायटीच्या आराममिशन जवळील सार्वजनिक विहिरीत आज सायंकाळी एका युवकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. सदर युवकाचा मृत्यू कशामुळे झाला, त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली की.. घातपात..? याचे कारण सध्या तरी गुलदस्त्यात आहे.
हिमायतनगर शहरातील गणेशवाडी भागातील रहिवासी बालाजी संजय बोईनवाड हा युवक दिनांक 6 डिसेंबर रोजी घरून कामाला जातो म्हणून गेला त्या दिवशीपासून तो घरी आला नाही. कामाला गेलेला युवक परत आला नाही त्यामुळे नातेवाईकांनी शोधा शोध केला. मात्र तो कुठे गेला याचा काहीच पत्ता लागला नाही त्या युवकाचा शोध सुरू असताना आज दिनांक 8 गुरुवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नेहरूनगर येथील आरामिशन जवळ असलेल्या सार्वजनिक विहिरीमध्ये कोण्यातरी अज्ञात युवकाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसले.
या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली पाहता पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. ही बाब पोलिसांना माहीत होताच घटनास्थळी हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर व त्यांचे सहकारी पोचले. त्यांनी घटनेची पाहणी करून पंचनामा करत विहिरीतील पाण्यात बुडून मयत झालेल्या युवकाचे प्रेत बाहेर काढण्यात आले. प्रेत बाहेर काढल्यानंतर गेल्या 2 दिवसापासून बेपत्ता असलेला शहरातील गणेशवाडी भागातील रहिवासी बालाजी संजय बोईनवाड हा असल्याची काहींनी ओळखले.
पोलिसांनी सदर युवकाचा मृतदेह हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी आणला. वृत्त लिहीपर्यंत सदर युवकाचा मृत्यू कशामुळे झाला... मृत्यूचे नेमके कारण काय...? दोन दिवसापूर्वी कामाला जातो म्हणून गेलेला युवकाचा असा अचानक विहिरीत मृतदेह आढळणे याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. युवकाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली की...? घातपात झाला याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहे . दरम्यान या घटनेचा तपास हिमायतनगर पोलीस करीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत यासंदर्भामध्ये हिमायतनगर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक बी डी भुसनूर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे.