नांदेड| प्रा. नारायण शिंदे हे सुधारणावादी व चिंतनशील लेखक आहेत. समाजाची प्रगती झाली पाहिजे यासाठी त्यांना सुशिक्षितांनी डोळस बनविण्याची गरज आहे. याच भूमिकेतून त्यांनी एकांकिका लिहिल्या असून त्यांचा 'रंग एकतेचा' हा संग्रह निश्चितच उद्याचे सज्ञान नागरिक घडवतील असे उद्गार प्रसिद्ध बालसाहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी काढले.
प्रा. नारायण शिंदे यांनी खास शालेय विद्यार्थ्यांसाठी 'रंग एकतेचा व काही एकांकिका' हे पुस्तक लिहिले आहे. इसाप प्रकाशनाने ते प्रकाशित केले आहे. कृष्णूर ता. नायगाव येथील जय भवानी माध्यमिक व क. महाविद्यालयात आयोजित प्रकाशन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश सावंत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी वीरभद्र मिरेवाड हे होते. तसेच लेखक प्रा. नारायण शिंदे, आनंद पुपलवाड, मुख्याध्यापक एन. एन. मठपती, ह. स. खंडगावकर, ज्ञानेश्वर शिंदे गागलेगावकर आदिंची उपस्थिती होती तर विद्यार्थिनी कु. संतोश्री जाधव, कु. शिवानी देगलुरे, कु. तेजश्री स्वामी, कु. संघमित्रा कागडे, शिवानी जाधव, कु. निकिता जाधव आणि विद्यार्थी आदर्श कागडे यांची वक्ते म्हणून व्यासपीठावर उपस्थिती होती.
प्रारंभी दीपप्रज्ज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर प्रकाशक दत्ता डांगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते 'रंग एकतेचा व काही एकांकिका' या संग्रहाचे प्रकाशन झाले. लेखक या नात्याने प्रा. नारायण शिंदे यांनी या लेखनामागच्या प्रेरणा व उद्देश सांगितला. तसेच प्रत्यक्षातही आपण अशी गावसुधारणेची कामे करीत असल्याचे सांगितले. पुढे बोलताना डॉ. सावंत म्हणाले की, हा लेखक 'बोले तैसा चाले' आहे. तो सुधारणेची सुरुवात प्रत्यक्ष आपल्या स्वतःपासून व गावापासून करतो आहे. यातून जीवनाचे धडे मिळतात. विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या या एकांकिका आहेत असेही त्यांनी म्हटले.
वीरभद्र मिरेवाड यांनी लालित्यपूर्ण शैलीत लेखकाचा परिचय करून दिला. आपल्या भाषणात ते म्हणाले की, नारायण शिंदे हे एक अक्षरविद्यापीठच आहेत. माळकरी, मळेकरी असूनही त्यांची दृष्टी प्रगती शीलतेची आहे. त्यांच्या परिवर्तनाच्या नांदी असलेल्या एकांकिका या मानवीमूल्यांचा आग्रह धरणाऱ्या आहेत. साहित्यात त्यांची मोजकी पुस्तके असलीतरी सकस स्वरूपाच्या आहेत असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन कवी व्यंकट आनेराये यांनी केले. या कार्यक्रमास कृष्णूर येथील सरपंच साहित्यप्रेमी, शिक्षक, शिक्षिका व बहुसंख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कष्णूर येथील सरपंच व गावातील साहित्य प्रेमी नागरिक उपस्थित होते.