या भागातील नागरीकातून महावितरण विभागाच्या नाकर्तेपणाबाबत तीव्र संताप
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील फुले नगर व सिद्धार्थ नगर भागात सकाळपासून विद्दुत पुरवठा खंडित झाल्याने या भागातील नागरिकांना पाणी टंचाईसह रात्र अंधारात काढण्याची वेळ आली असून, गणेशोत्सवात गणेशभक्तांना देखील अंधाराचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या भागातील नागरीकातून महावितरण विभागाच्या नाकर्तेपणाबाबत तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.
मागल्या १५ दिवसापासून हिमायतनगर शहर व परिसरात महावितरण कंपनीने विजेचा लपंडाव चालविला आहे. त्यामुळे ऐन आरतीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे भाजपने या संदर्भात निवेदन दिले होते. तरीदेखील वीजपुरवठ्यातील व्यत्यय जैसे थेच आहे. आता तर नगरपंचायत हद्दीत असलेल्या हिमायतनगर शहरातील रेल्वे स्थानकांच्या मागील बाजूला असलेल्या फुले नगर आणि सिद्धार्थ नगर भागात सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाषराव दारवंडे यांनी यासाठी संबंधित लाईनमन, कनिष्ठ अभियंता, उपकार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता भोकर यांच्यापर्यंत संपर्क केला. मात्र या भागाचा वीजपुअरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे येथील गणेश गोर गरीब नागरिकांना भर पावसाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागला आहे.
एव्हडेच नाहीतर रात्र अंधारात काढण्याची वेळ आली असून, या वस्तीच्या बाजूला सर्वंतर शेती परिसर असल्याने विंची, किडे, सरपटणारे प्राणी यांच्या भीतीमुळे नागरिकांना रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. त्यातच गणेशोत्सवाच्या शेवटचा टप्पा सुरु असताना विविध उपक्रम राबविताना व गणपती बाप्पाची आरती करताना गणेशभक्तांना अंधाराचा सामना करत आरती उरकावी लागली आहे. विद्दुत पुरवठा सुरळीत का..? होत नाही. याचा जाब विचारण्यासाठी संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे सुभाष दारवंडे यांनी सांगितले.