नांदेड| देशाची सध्याची स्थिती अत्यंत बिकट असून या संकट काळात समाजवादी विचारातूनच देशातील सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो, असे मत माजी आ. गंगाधर पटणे यांनी व्यक्त केले.
प्रख्यात समाजवादी नेते साथी मधू लिमये यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सायं दै.नांदेड वार्ताने प्रकाशित केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन माजी आ.पटणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी समाजवादी विचारांचे महत्त्व विशद करून दिवंगत साथी मधु लिमये यांचा संघर्षमय जीवनपट उलगडून सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना प्रो. डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी देशस्तरावर भाई मधु लिमये यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय समिती मार्फत वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मधु लिमये यांच्या जीवनावर प्रकाशित टाकणार्या लेख, पुस्तक, विशेषांकाचे प्रकाशन या काळात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रास्ताविक करतांना सायं दैनिक नांदेड वार्ताचे संपादक ऍड.प्रदीप नागापूरकर म्हणाले की, समाजवादी आणि साम्यवादी विचार हे सर्वसामान्यांना दिलासा देणारे होते. या विचारांनी सार्वजनिक सेवा सार्वत्रिक करण्याचा मंत्र दिला होता. कोरोनाच्या या संघर्षमय काळात वाढत्या खाजगीकरणामुळे आणि अपुर्या वैद्यकीय सुविधांमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, सार्वजनिक वितरण प्रणाली बळकट करण्याची गरज भासत आहे. राष्ट्रीयकरणाचे महत्व 50-75 वर्षापूर्वी लिमये सारख्या दृष्ट्या नेत्यांनी ओळखले होते. त्यांच्या कार्याची आज समाजाला खर्या अर्थाने गरज असल्याचे ऍड.नागापूरकर यांनी सांगितले. यावेळी उपप्राचार्य बालाजी कोम्पलवार, उपप्राचार्य अशोक सिद्धेवाड, कॉ.शिवाजी फुलवळे, माधव स्वामी, प्रशांत गजभारे आदी उपस्थित होते.