नांदेड। ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी प्लास्टिक बंदी व स्वच्छता विषयावर सजावट तसेच देखावे करून नागरिकांमध्ये जनजागृती करावी. त्याचप्रमाणे स्वच्छता विषयक वक्तृत्व स्पर्धा, निबंध व रांगोळी स्पर्धा घेऊन स्वच्छतेची भावना भाविकांमध्ये निर्माण करावी असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण भागात शौचालयाची सुविधा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, आवश्यक तेथे सार्वजनिक शौचालयाची सुविधा दिली जाते. पर्यावरण पूरक गाव करण्यासाठी वृक्ष लागवडीसह एकल प्लास्टिक वापराबाबत गाव स्तरावर जनजागृती करून प्लास्टिक बंदी केली जाणार आहे. गाव स्तरावर गणेश मंडळांनी स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा.
पर्यावरण व स्वच्छतेचे देखावे तयार करून स्वच्छतेचे संदेश द्यावेत तसेच स्वच्छता विषयावर वक्तृत्व, निबंध व रांगोळी स्पर्धाही घ्याव्यात असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. स्वच्छता ही सेवा या उपक्रमातंर्गत गाव स्तरावर दृश्यमान स्वच्छतेची राष्ट्रव्यापी मोहीम 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.