नांदेड, अनिल मादसवार| महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या आणि अत्यंत महत्त्वकांक्षी ठरणाऱ्या नांदेड - बिदर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून पिंक बुक मध्ये नोंदही करण्यात आली आहे. परंतु एक वर्ष उलुटून गेले तरी अद्यापही या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामीण भागाला विकासाच्या प्रवाहात आणणाऱ्या नांदेड बिदर या रेल्वे मार्गाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी. त्या अनुषंगाने दोन्ही राज्यांना कालमर्यादा द्यावी अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोकसभेत केली .
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोकसभेत अत्यंत महत्त्वाचा असलेल्या नांदेड बिदर रेल्वेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लक्ष घालून नांदेड - बिदर हा रेल्वे मार्ग मंजूर केला होता. त्यासाठी पिंक बुक मध्ये तरतूदही करण्यात आली आहे परंतु त्यानंतर या कामाच्या प्रगतीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी संपर्क केला असता रेल्वे मंत्रालयाने जे पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र आणि कर्नाटका दोन्ही राज्याच्या सहमतीसाठी हा प्रस्ताव प्रलंबित आहे .
दोन्ही राज्यकडून सहमती मिळाली नसल्याने या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. परिणामी नांदेड - बिदर मार्गावरील ग्रामीण भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विलंब होतो आहे ही बाब अत्यंत गंभीर असल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही सरकारला आपली सहमती देण्यासाठी आणि राज्यांचा आर्थिक वाटा उचलण्यासाठी कालमर्यादा निश्चित करून द्यावी आणि तातडीने या मार्गाच्या कामाला सुरुवात करावी. जमीन अधिग्रहणाचे प्रश्न दोन्ही राज्याने आपापल्या कार्यक्षेत्रातील तातडीने सोडवावेत यासाठीही केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे. त्यामुळे नांदेड - बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न सोडवून घेण्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पुन्हा एकदा लोकसभेत आपला आवाज उठवला आहे.