नांदेड| भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, वाङमय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने वरिष्ठ महाविद्यालयातील बी. ए. पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पातळीवर आयोजित निबंध स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संचालीका डॉ. शैलजा वाडीकर यांनी केले आहे.
इंग्रजी आणि मराठी भाषेत स्वतंत्रपणे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, मराठी भाषेतून निबंध लिहिणाऱ्यांसाठी १. महाकवी संत तुकाराम, २. माझ्या गावची बोली आणि तिची वैशिष्ट्ये, ३. मराठी भाषा संवर्धनासाठीचे उपाय. तर इंग्रजी भाषेतून निबंध लिहिणाऱ्यांसाठी 1. Scope of English and foreign languages in India, 2. My favourite author, 3. India of my dreams हे विषय देण्यात आले आहेत.
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यास रु. ५०००, ३००० आणि २००० रुपयांचे रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात येईल. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान केले जाईल असे स्पर्धेचे संयोजक डॉ. पृथ्वीराज तौर आणि डॉ. रमेश ढगे यांनी कळवले आहे.
बी. ए. पदवी स्तरावर मराठी किंवा इंग्रजी ऐच्छिक विषय घेऊन अध्ययन करणारे द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी आपले निबंध पोस्टाने अथवा गुगल फॉर्मच्या साह्याने अथवा भाषा संकुलामध्ये दि. १० ऑगस्ट २०२२ पर्यंत पाठवावेत. निबंधासोबत महाविद्यालयाचे ओळखपत्र, आधार कार्ड, मोबाईल नं.व व्हाट्सअप क्रमांक, पोस्टाचा अचूक पत्ता आणि ई-मेल पत्ता जोडणे अनिवार्य आहे. बी. ए. पदवी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तसेच मराठी व इंग्रजी विभागाच्या प्रमुखांनी विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रेरीत करावे, असे आवाहन भाषा संकुलाच्या संचालीका डॉ. शैलजा वाडीकर यांनी केले आहे.