इंदोर| इंदूरहून पुण्याकडे (अमळनेर) जाणारी बस मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात धामनोद येथील खलघाटाजवळ खळखळणाऱ्या नर्मदा नदीत कोसळली. रात्री १० ते १०.१५ वाजेच्या दरम्यान खलघाट येथील दुपदरी पुलावर एका वाहनाला ओव्हरटेक करताना बस अनियंत्रित झाली. आणि चालकाचा तोल गेला त्यात बस रेलिंग तोडून नदीत पडली.
अजूनही बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इंदूरजवळ अपघात झालेली एसटी बस MH 40 N 9848 ही जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आगारची असल्याची माहिती समोर आली आहे. इंदौरमधून ही बस सकाळी 7.30 ला अमळनेरच्या दिशेनं रवाना झाली होती.
बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह ४० प्रवासी होते. आतापर्यंत १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये ८ पुरुष, ४ महिला आणि १ लहान मुलाचा समावेश आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी १५ प्रवाशांना जिवंत बाहेर काढल्याचा दावा केला आहे. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाने सांगितले की, आतापर्यंत एकही प्रवासी जिवंत सापडला नाही.