सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी...
मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड तालुक्यात मागील १५ दिवसापासुन संततधार पाऊस सुरू आहे.गेल्या १५ दिवस सूर्यदर्शनही झाले नाही,सततच्या पावसामुळे सर्वत्र पुर परिस्थिती निर्माण झाली होती संततधार पावसामुळे पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे प्रशासनाने करून नुकसानीचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे मुखेड तालुका उपाध्यक्ष बालाजी राठोड यांनी राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
याबरोबर मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणीही राठोड यांनी केली. यंदाच्या खरीप हंगामामध्ये बार्हाळी, मुक्रामाबाद,येवती,जांब,चांडोळा, एकलारा, सावरगाव,दापका या महसूल मंडळात संततधार पाऊस झाला.पावसामुळे असंख्य शेतकऱ्यांची नागरिकांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, आधीच खरीप हंगामामध्ये पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट ओढवले होते,काही शेतकऱ्यांनी तर पदरमोड करून दुबार पेरणी केली होती.
मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सध्या पिके चांगल्या स्थितीत होती,परंतु गेल्या पाच दिवसापासून संततधार पाऊस पडल्याने पिके पिवळी होऊन नष्ट झाली आहेत,लहान ओढे, नदीकाठच्या शेतातील पिके पुरामुळे चक्क वाहून गेली आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे, यामुळे मुखेड तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आपल्या स्तरावरुन प्रशासनाला आदेश देण्यात यावेत आणी मुखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा मागणी सरकारकडे केली आहे.
तसेच यासंदर्भात राज्यसरकारकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातुन पाठपुरावा करून अतिवृष्टीनेग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही राठोड यांनी सांगितले आहे.