नांदेड| १२५ वर्षापूर्वी जे शाहू महाराजांनी राबवून दाखविले ते आजही आपल्या विचारशक्ती पुढे आहे. मग ते अस्पर्शता निर्मूलन असो, शिक्षण असो, आपत्ती व्यवस्थापन असो, की त्यांची दूरदृष्टी असो, त्या काळात महाराजांनी जी दूरदृष्टी ठेवून निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणी केली आहे. ते आजही आपणास चमत्कार वाटतात. शिक्षणाचे महत्त्व त्यांना त्याकाळी पटले होते म्हणून त्यांनी स्वतःकडील संपत्तीमधील बराच भाग गोर-गरिबांच्या मुलांना घडविण्यासाठी खर्च केला. म्हणून राजश्री शाहू महाराजा सारखा राजा पुन्हा होणे नाही, असे मत मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक डॉ. विजय चोरमारे यांनी व्यक्त केले.
ते आज मंगळवार दि. २८ जून रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्रामध्ये आयोजित छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये ‘छत्रपती शाहू महाराज यांची सामाजिक न्यायाची भूमिका’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले होते, प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषदेचे सदस्य परमेश्वर हाजबे, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, समन्वयक डॉ. पी. विठ्ठल यांची उपस्थिती होती.
पुढे डॉ. चोरमारे म्हणाले तळा-गाळातल्या समाजातील जीवनस्तर उंचावण्यासाठी अनेक योजना त्यांनी त्याकाळात राबविल्या. दुष्काळामध्ये ५०,००० हजार अनाथ आणि असक्षम नागरिकांची त्यांनी दोन वेळ जेवणाची व्यवस्था केली होती. त्यामुळे त्याकाळी कोल्हापूरमध्ये एकही नागरिक भुकेने मेला नाही. अनेक समाजासाठी स्वतंत्र वस्तीगृह काढले. त्यामुळे त्या-त्या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले. शेवटी अध्यक्ष समारोपामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी राजर्षी शाहू महाराजाबद्दल आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमास विद्यापीठातील शिक्षण विभागाचे संचालक डॉ. रमजान मुलाणी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, उद्धव हंबर्डे, काळबा हनवते, डॉ. नितीन गायकवाड, संदिप जाधव, विकास भोसले, अनिल सोनकांबळे, जालिंदर गायकवाड, संदिप एडके, संभा कांबळे, संजय चौदंते, रामदास खोकले, प्रदिप बिडला, हरि जाधव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.