मुंडकर घराण्याशी आमचे फार पूर्वी पासूनचे संबंध. बिलोली येथील पञकार गोविंद मुंडकर यांचे आजोबा परमेश्वरराव यांच्या काळा पासुनच जवळचे संबंध होते आणि आताही आहेत.माझे वडील हनुमंतराव यांचे ते मित्र होते.अडीअडचणीच्या वेळी व एरवी त्यांच्यात चर्चा व बोलणी होत असे.तेव्हापासून घरोब्याचे संबंध निर्माण झाले होते.
निजामी काळात, जेव्हा सन १९४५-४६ मध्ये बिलोलीत प्लेग या महामारी चे संकट आले होते. तेव्हा गावात लोकं मरत होती.घरातील एक मेला की,घरी येवून दुसऱ्यास स्मशान भूमीत नेण्याची तयारी करावी लागे. गावावर आसमानी सुलतानी संकट आले होते. अशा संकट समयी परमेश्वर,(आजोबा ) आमच्या मदती साठी धावून आले.आणि मदत केली.प्लेग मुळे गावं रिकामी झाली होती.यशावेळी स्वतःचे व मुला बाळाचे जीव वाचावे म्हणून लोकं रानात जावून खोप्या टाकून राहू लागली.त्यावेळी मामा(बसवंतराव) व त्यांचे वडील आमच्या मदतीस धावून आले.त्यांनी त्यांच्या मालकीच्या शेतात आमचीही खोपी (छोटीशी झोपडी) होती. ती तयार करण्यास आमची मदत करून संपूर्ण साहित्य मोफत दिले.
त्या संकट समयी आम्ही शेजारी शेजारी रहात होतो.तेव्हा पासून आमचे या कुटुंबाशी जवळचे संबंध होते.आज पर्यंत ते टिकवून आहेत. आडचणीत लोकं एक मेकाला सहाय्य करीत.त्याचे हे उत्तम उदाहरणं आहे.म्हणून म्हणतात "मित्र तोच खरा जो आडचणीत कामी येतो." गावात म्हणावी तशी शिक्षणाची सोय नव्हती.सातवी पर्यंतच सरकारी शाळा होती.तिथे गावातील मुलांचे शिक्षण झाले.उर्दू शिक्षणाचे माध्यम होते पण मराठी भाषेतून पुढे शिक्षण मिळू लागले होते.ते घोकंपट्टी चे दिवस होते. सन १९४०-५० च्या दशकात बिलोलीत ७ व्या वर्ग पर्यंतच्या शिक्षणाची सोय झाली होती.यात शिवाजी पाटील,हनुमंतराव पाटील,मोगलाजी नरोड,रामचंद्र फुलारी ,नरसिंग वारिक,भगवान,निलाजी,नारायण चौधरी,यादव तुडमे( ज्येष्ठ),पिराजी संगन्ना,म्हादायप्पा जंगम,वाणी माधव, विठलराव पाटील,रामदास गणपतदास,गोविंद सोनार,किशन गौड,शेख अबूबक असे कितीतरी विद्यार्थी ५० च्या दशकात सरकारी शाळेतून शिकून बाहेर पडली.
त्या पैकी एक म्हणजे माझे मामा "कै.बसवंतराव मुंडकर". सरकारी शाळेतून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.पालकांची आपल्या पाल्यास पुढे शिकविण्याची ईच्छा असूनही आपल्या पुढील शिक्षण घेता येत नव्हते. मामांचीही ईच्छा तशीच राहून गेली.जे वरिष्ठ वर्गाची व ऐपतदार घरची मुलं होती त्यांनी नांदेड व हैदराबाद येथे जाऊन उच्च शिक्षण घेतले व ती पुढे गेली. मामाचे मात्र इथेच शिक्षण थांबले.तो काळ निजामाचे राज्य जावून आपले राज्य सुरू झाल्याचा काळ होता.त्या नंतर बहुजन समाजातील मुलं शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पुढे आली.म्हणून गावातील सुशिक्षितांचे प्रमाण थोडे वाढत चालले होते. शैक्षणिक काळातच मामाला खेळाची आवड निर्माण झाली.हॉलीबॉल व हुतूतू (कब्बडी) हे त्यांचे आवडीचे खेळ होते.मी त्यांचे कपडे सांभाळत बाजूलाच खेळ पहात बसून रहात असे.खेळ बघत बसलेले दिवस मला अजूनही आठवतात.विश्वनाथ देसाईच्या मळ्यात मामा व त्यांचे मित्र खेळत असलेले अजून मला दिसतात.शाळेत नागनाथराव चौडेकर नावाचे क्रीडा शिक्षक नवीनच बदलून आले होते.आणि त्यांनी व्हॉलीबॉल हा खेळ
सुरू केला व मुलांना ते शिकवू लागले.शाळेतील सर्व मुलं खेळात भाग घेत.त्या प्रमाणे मामाने ही थोड्याच दिवसात या खेळात प्रावीण्य मिळविले.बिलोलीतील त्यांचा व्हॉलीबॉलचा पहिला संघ ठरला.जुन्या पिढीतील खेळाडू कडून प्रेरणा घेवूनच गावात उत्तम पैकी खेळाडू तयार झाले व जिल्हा व राज्य पाताळीवर खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून गांवाचे आणि आपल्या जिल्ह्याचे नाव केले. वानगी दाखल या ठिकाणी उत्तम खेळाडूंची नावं दिल्यास कांहीं वावगे होणार नाही असे मला वाटते.ती नावं येणे प्रमाणे आहेत.
व्हॉलीबॉल मध्ये एकनाथ जाधव,पंढरीनाथ गौड, नरसन्ना सांडगे,वैजनाथ मेघमाळे,जी एस गादगे,मोहम्मद बावजीर,नरसिंम्मा सुर्गलोड,सुभाणा अंकोशकर,शंकर अंकोशकर यांच्या सारखे दर्जेदार खेळाडू, ते जर नसले असते तर बिलोली येथे इतके खेळाडू व्हॉलीबॉल या खेळात घडले नसते.ही सर्व मागील पिढीतील खेळाडूंची देणं आहे.असे मला वाटते. शिक्षण संपल्यावर सहध्यायी मुलां पैकी बऱ्याच जनांकडे घरची शेती होती.त्यांनी तो व्यवसाय निवडला. कांहींनी गावच्या राजकारणात भाग घेतला,कांहीजन निरनिराळे व्यवसाय करू लागले तर कांहींजन नोकरीत गेले.त्या पैकी बसवंत मुंडकर मामांनी नोकरी करण्याचे ठरविले.
शिक्षण संपले,संसाराची जबाबदारी ही खांद्यावर आली होती.काहीतरी उद्योग व्यवसाय किंवा नोकरी करून कुटुंबाला हातभार लागावा, त्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण झाली.तसे प्रयत्न सुरू केले.त्यासाठी त्यांनी माझे वडील भाऊ विठलराव व बसवंतराव मामा हे दोघे देगलूर येथे सहकार क्षेत्राच्या प्रशिक्षणास गेले. तीन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून त्याची परीक्षा यशस्वीरित्या पास करूनच बिलोलीस परतले.गट सचिव म्हणून त्यांची लगेच संस्थेवर नेमणूक झाली.सन १९६१ ला ते एका संस्थेवर कामास सुरुवात केली.ग्रामीण भागात त्यांनी शेतकरी सभासदांना शेतीसाठी एनडीसीसी बँके कडून कर्ज उचलून देण्याची व ती वसूल करण्याचे काम स्वीकारले. आणि ते सेवेत असे पर्यंत त्यांचे काम अतिशय सचोटीने,जबाबदारीने व अतिशय प्रामाणिक पणे आपली जबाबदारी पार पाडली. त्यावेळी गट सचीवांवर झालेला अन्याय त्यांना सहन होत नव्हता.त्यांची बाजू घेवून मामा वरीष्ठ अधिकाऱ्यांशी नेहमी लढा देत.सचिवाची नेहमी बाजू मांडत.
एक तर सचिवांना मासिक वेतन नियमित मिळत नसे.चार चार महिने पगारी मिळत नसतं.हे मामाला सहन होत नसे.हे सारखे सहकार खात्यातील आधिकार्यांच्या नजरेला येवू लागले.नेहमीच संघर्ष नको म्हणून एके दिवशी नोकरीचा राजीनामा देवून ते मोकळे झाले. स्वाभिमानी मनुष्य किती दिवस निलाजरे सारखे जगू शकेल?हे मामाच्या बुद्धीला पटले नव्हते आणि पटणारे नव्हते.म्हणून मामांनी हा मार्ग पत्करला होता. मुळात मनुष्य फटकळ,आणि स्पष्टवक्ता.जे काही मनात असेल समोरच्या माणसाच्या तोंडावर बोलणार,मग त्याला कांहीं का वाटेना,असा मामाचा स्वभाव होता.माघारी एक चकार शब्दही ते बोलणार नाही.स्वाभिमानी माणसांचे खरे म्हणजे असेच असते,असे मला वाटते. मी पण त्याच्या अश्या वागण्याचा अनुभव घेतला होता.
नोकरी तर सुटली होती,घराच्या जबाबदाऱ्या चालूच होत्या.खाणारी चार तोंड आली होती.प्रपंच वाढला होता.तसा खर्च ही वाढला होता.ओढाताण चालू होता.पाच सहा मुलांचं शिक्षण,त्यांचं आरोग्य,कपडेलते घर खर्च इत्यादी बाबी माणसाच्या जिवाला तान येण्यास करणी भूत ठरतो.आजार आणि आणखी कांहीं बाबी असतील ज्यामुळे जिवन असह्य बनते.एकंदर मामाचे जीवन संघर्ष मय होते असे म्हणावे लागेल.
ऐका दिवशी मामाचे(बसवंतराव) निधन झाल्याची बातमी आली ती दुर्दैवी तारीख २० जुलै १९८३ ही होती. कर्तबगार माणसं निघून जातात मागे समाजासाठी कांहीं तरी छाप सोडून जातात.तसे मामाचे झाले आहे. बऱ्याच गोष्टी त्यांच्या जीवना पासून घेण्या सारखे आहेत असे मला वाटते. त्या म्हणजे:- त्यांचा स्पष्ट वक्ते पना,त्यांचा स्वाभिमान,अण्याया साठी लढणे,खेळ व खिलाडू वृत्ती,कुटुंबासाठी समर्पण भावना.अशा अनेक बाबी त्यांच्याकडून शिकाण्यासारख्या होत्या असे मला या स्मरणा प्रित्यर्थ वाटते. कै.बसवंतराव मुंडकर यांच्या स्मृती पित्यार्थ त्यांचे सुपुञ पञकार गोविंद मुंडकर यांनी चालवलेल्या कृतज्ञता पित्याची..! या कार्यक्रमास माझ्या शुभेच्छा देतो.व आमचे मामा कै.बसवंतराव मुंडकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो.
....वैजनाथराव मेघमाळे, (बिलोलीकर), परभणी.,(सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक)