हिमायतनगरच्या ग्रामीण रुग्णालयाला उपचाराची गरज... अधिकाऱ्यांच्या कमतरतेने रुग्णांची गैरसोय
हिमायतनगर(प्रतिनिधी)ग्रामीण रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा दिसून येत असल्याने रुग्णांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराकडे तालुक्याचे आ.नागेश पाटील आष्टीकर व जिल्हाशल्य चिकित्सकांनी लक्ष देवून गैरसोय दूर करावी अशी मागणी केली जात आहे.
दैनंदिन बाह्य रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे किमान चार ते पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांची निकडीची गरज असल्याचे रुग्णांच्या रांगेवरून दिसून येत आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्व मान्य पदे भरलेली आहेत. परंतु काही कारणास्तव वैद्यकीय अधिकार्यांनी इतर ठिकाणी प्रतिनियुक्त्या करून घेतल्या आहेत. सध्या या ठिकाणी रुग्णालयातील ओपीडी, अंतररुग्न, कुटुंब नियोजन, अपघात यासह अन्य कामे हि वैद्यकीय अधीक्षक एस.एम.गायकवाड वसमतकर यांनाच पहावी लागत आहेत. त्यामुळे सर्व भार एकच अधिकार्यावर पडत असल्याने रुग्णांची गैरसोय होत असून, वेळेवर उपचार मिळत नसल्याने गरिबांना खाजगी रुग्णालयाकडे जावे लागत आहे. कार्यरत पैकी श्री हनमंत जाधव या अधिकार्यांनी सोयीनुसार आपली प्रतिनियुक्ती नांदेडच्या स्त्री रुग्णालयात करून घेतली आहे. श्री धुमाळे यांनी स्वताहून कार्यमुक्त करण्याचे पत्र वरिष्ठांना दिले आहे. तर डॉ. डी. डी. गायकवाड हे सुद्धा प्रतिनियुक्तीवर गेले आहेत. येहील रुग्णालयात भोकर येथील जगदीश जाधव हे अधिकारी केवळ दोन दिवसासाठी प्रतिनियुक्तीवर येतात. यामुळे हिमायतनगर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा कागदोपत्री रिक्त नसल्यातरी प्रत्यक्षात मात्र रिक्त असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना नव्हे तर ग्रामीण रुग्णालयास डॉक्टरांच्या उपचाराची गरज असल्याचे नातेवाईकातून बोलले जात आहे. आजघडीला येथील परिस्थिती पाहता तातडीने वैद्यकीय अधिकारी कार्यरत होणे गरजेचे आहे. याकडे जिल्हा शल्य चिकित्सक श्री कंदेवाड यांनी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे व कार्यरत एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे होत असलेले हाल बघून तातडीने येथे अन्य डॉक्टरांची कायम नियुक्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे.