नांदेड (एनएनएल) कोपर्डी घटनेतील नाराधमांना तत्काळ फाशी द्या, मराठा आरक्षण, स्वामीनाथन आयोग व शेतकऱ्यांच्या कर्ज माफी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे ९ ऑगस्ट क्रांती दिनी काढण्यात येणाऱ्या राज्यव्यापी मराठा क्रांती मूक मोर्च्यासाठी नांदेडातून हजारो समाजबांधव मुंबईला रवाना झाले.
कोपर्डी येथील घटनेनंतर प्रत्येक जिल्ह्यात ५ लाखापासून ते ४० लाखापर्यंत मराठा समाज बांधवांचे महामोर्चे विविध मागण्यांसाठी निघाले. केंद्र व राज्य सरकारने गेल्या २५ ते ३० वर्षामध्ये आखलेली धोरणे, धोरणानुसार पारित केलेले कायदे व नियमामुळे राज्यात कष्टकरी श्रमकरी समाजावर अन्याय झाला आहे, अशी सार्वत्रिक भावना आहे. यातूनच विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने वज्रमूठ आवळली. सरकारने महाराष्ट्रभर निघालेल्या मोर्चांची दखल घेतली नसल्याने बुधवारी ९ ऑगस्ट क्रांती दिनी मुंबई येथे राज्यव्यापी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चास नांदेडहुन हजारो मराठा समाज बांधव मुंबईला रवाना झाले आहेत. अशी माहिती सकल मराठा समाज क्रांती मोर्चा नांदेडचे संकेत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. यावेळी सरस्वती धोपटे, वंदना मस्के, मनोरमा चव्हाण, मनकर्ना ताटे, रत्नमाला जाधव, ज्योती पाटील, गिरजाबाई कदम, ललिता लोखंडे, संकेत पाटील, सुभाष कोल्हे, शशिकांत गाढे, शिवाजी हंबर्डे, दिपक भरकड, गजानन शिंदे, तानाजी पाटील, शिवराज पाटील, बालाजी पाटील, दत्ता पाटील संतोष इंगोले, अशोक कदम, श्याम पाटील, गजानन पवार माणिक चव्हाण, केदार ढगे, उमरीहून गोविंद ढगे, भगवान कदम दशरथ कदम, गजानन इंगोले, राजू देशमुख, जयदीप जाधव, गोविंद शिंदे, अजय कदम, विशाल शिंदे, यांच्यासह हजारो सकल मराठे समाज बांधव भगिनी मुंबई मोर्चास रवाना झाले.
मोर्चातील मागण्या मागण्या पुढील प्रमाणे
1) मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील तिन्ही आरोपींच्या विरोधात शिघ्र गतीने फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. 2) अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात दुरूस्ती झाली पाहिजे. 3) मराठा समाजासाठी नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळाले पाहिजे. 4) कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा यांना जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमीत करणे. 5) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजासाठी सिमीत करून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे. 6) मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था निर्माण करावी. 7) शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्ती व शेती मालास हमीभाव द्यावा. 8) प्रकल्पासाठी जमीन संपादन करताना शेतकऱ्यांना देशोधडीला लावणे थांबवावे. 9) आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास आर्थिक मदत व नोकरी द्यावी. 10) छत्रपती शिवरायांचे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारावे. 11) छत्रपती शिवरायांचे गडकोट विकासाचे काम त्वरित हाती घ्यावे. 12) राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर येथील शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम चालू करण्यात यावे. 13) प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवनासाठी शासकीय जमीन देण्यात यावी. 14) प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थी वसतिगृहासाठी जिल्हा परिषद व स्थानिक महापालिकांना निर्देश देण्यात यावे. 15) अल्पभूधारक शेतकरी व रू. 6 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मराठा कुटुंबातील मुलांना सवलती द्याव्या. 16) मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीनुसार ईबीसी योजनेची आर्थिक मर्यादा 1 लाखावरून 6 लाख केली आहे. त्याच्या शासन निर्णयात दुरूस्ती करावी. 17) महाराष्ट्र-कर्नाटक सिमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारने ठोस कृती आराखडा आखावा. 18) मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण व मराठा समाजातील युग पुरूषांची बदनामी थांबवावी.