मुंबई, प्रतिनिधी उद्योगपतींच्या सोयीसाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करत असून काँग्रेस पक्ष कामगारांच्या हिताच्या रक्षणासाठी कटिबध्द आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.
आज सकाळी खा. अशोक चव्हाण यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणा-या हुतात्म्यांना वंदन केले. त्यानंतर टिळक भवन येथे त्यांच्या हस्ते
ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी खा. अशोक चव्हाण यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या स्थापनेपासून काँग्रेस सरकारांनी केलेल्या विकास कामांमुळे महाराष्ट्र प्रगत राज्य झाले. काँग्रेस सरकारांनी राबविलेल्या धोरणामुळे महाराष्ट्रात उद्योग धंद्याची भरभराट झाली. लोकांना रोजगार मिळाला. काँग्रेस सरकारने कायम कामगारांच्या हिताचे रक्षण केले. पण केंद्रातले आणि राज्यातले भाजप सरकार कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्ष कामगारांच्या व कष्टक-यांच्या हितासाठी या सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करेल असे खा. चव्हाण म्हणाले.
यावेळी बोलताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनीही सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रातले सरकार कामगाराच्या सुरक्षेवर हल्ला करत असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तयार राहावे असे आवाहन मोहन प्रकाश यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. यावेळी माजी मंत्री कृपाशंकर सिंह, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारूलता टोकस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा, अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र दळवी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामकृष्ण ओझा, रमेश शेट्टी, पृथ्वीराज साठे, संजय चौपाने, अल् नासेर झकेरिया यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.