चिमुकल्यांनी दिला कुपोषण मुक्तीचा संदेश
हिमायतनगर(वार्ताहर)शहर व ग्रामीण भागातील अंगणवाडीच्या वतीने बालदिनाचे औचित्य साधून ठीक ठिकाणी प्रभातफेरी द्वारे चिमुकल्यांनी कुपोषण मुक्तीचा संदेश दिला आहे.
दि.१४ नोव्हेंबर बाल दिनानिमित्त राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. याचा पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागातील अंगणवाडी ताई, मदतनिस यांच्या पुढाकारातून चिमुकल्या बालकांची हाती फलक घेवून जनजागरण प्रभात फेरी काढण्यात आली. तत्पूर्वी अंगणवाडीमध्ये दाखल झालेल्या चिमुकल्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. त्यानंतर काढण्यात आलेल्या प्रभात फेरीत चिमुकल्यांनी वेळेवर लसीकरण केले पाहिजे, जन्मजात बाळाला अर्ध्या तासाच्या आत चीकयुक्त दुध पाजविले पाहिजे, कुपोषण निर्मुलन झालेच पाहिजे, महिलांनी बाळाचा वाढदिवस केलाच पाहिजे, लेक वाचवा देश वाचवा, आदी घोषनातून संदेश देण्यात आला आहे. बालक दिनाच्या पार्श्वभूमीवर नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे चिमुकल्यांचा चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून आला आहे.