हवामानावर आधारित पीकविमा संरक्षण योजनेची नुकसान भरपाई तातडीने मिळावी
हिमायतनगर(वार्ताहर)राष्ट्रीय पिक विमा कार्यक्रम २०१४ हवामानावर आधारित पिक विमा योजने अंतर्गत शेतकर्यांना कापूस, सोयाबीन पिक संरक्षण विमा योजनेची रक्कम शेतकर्यांना तातडीने वितरीत करावी अशी मागणी सरसम बु.येथील शेतकर्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शासन निर्णय नुसार खरीप हंगाम २०१४-१५ मध्ये नांदेड जिल्ह्यासाठी हवामानावर आधारित पिक विमा योजने अंतर्गत कापूस, सोयाबीन विमा लागू झाला असताना अद्यापही सदर विम्याची रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोंचली नाही. खरीप हंगामात कृषी विभागाच्या सांगण्यावरून तालुक्यातील गरीब शेतकर्यांनी पिकांची पेरणी केली. परंतु वातावरणातील बदल पाहता हवामानावरील पिकविमा असल्याने बहुतांश शेतकर्यांनी खिशात दमडी नसताना देखील शासनाच्या फसव्या जाहिरातीला भुलून पिकविमा काढून हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैन्केत डी.डी.द्वारे रक्कम भरली.
दरम्यान पेरणीच्या काही दिवसात पर्जन्यमान कमी झाले, तसेच वातावरांतील बदलाने अपुरा पाऊस, १५ दिवसानंतर पडणारा महिना, दोन महिन्याचा खंड यामुळे हाती आलेली पिके नुकसानीत आली. हा प्रकार हमानामाच्या बदलामुळे झाला असून, या बाबतची नुकसान भरपाईचा विम्याची रक्कम मिळायला हवी होती. यासाठी अक्टोबर २०१४ पासून हिमायतनगर तालुका कृषी कार्यालय, नांदेड येथील कृषी कार्यालयास विचारपूस केली. मात्र संबंधिताकडून कोणतेही सकारात्मक उत्तर मिळाले नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक तर झाली नाही न असा सवाल उपस्थित होत आहे.
निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी पुरता हैराण झाला असून, पिके गेली, आता शासनानेही वार्यावर सोडल्याने पिकविमाही हाताचा जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकर्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. या बाबीकडे संबंधित विभाग व शासनाने जातीने लक्ष देवून तातडीने शेतकर्यांना हवामानावरील पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करावी. अन्यथा शेतकरी हक्कासाठी न्यायालयाच्या दारात जावे लागेल असा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे. यावर सर्सम परिसरातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्या आहेत.