औरंगाबाद| नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धींगत व्हावी यासाठी 'रन फॉर युनिटी ' चे आयोजन केले असून सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला ही आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त् राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी उद्घाटन प्रसंगी विभागीय क्रीडा संकुल येथे व्यक्त केले. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास सहकार मंत्री अतुल सावे, म्हाडाचे सभापती संजय केणेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ,पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातील अधिकारी, विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यामध्ये उस्फुर्त सहभागी झाले होते.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 महिन्यांनी मराठवाडा स्वतंत्र झाला आणि निजामाच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील करण्यात आला. एकसंघ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निझामाच्या विरोधात पोलीस ॲक्शन करण्यात आली, "एक भारत, श्रेष्ठ भारत" साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून देशभर विविध उपक्रम राबविले जात आहेत . जाती, धर्म, भाषा, हे वेगवेगळे असले तरी एकसंघतेच्या भावनेने 'रन फॉर युनिटी'चे आयोजन जिल्हा प्रशासनाने आयोजित केल्याबद्दल डॉ.कराड यांनी आभार व्यक्त केले.
या रॅलीचे आयोजन विभागीय क्रीडा संकुला पासून सूतगरणी चौक ते गजानन महाराज मंदिर ,पुन्हा याच मार्गाने विभागीय क्रीडा संकुल येथे समारोप करण्यात आला. प्रथम राष्ट्रगीत गायन झाले. त्यानंतर मशाल हातात घेऊन डॉ.भागवत कराड यांनी 'रन फॉर युनिटीच्या' रॅलीत सहभाग घेतला.