नांदेड| बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील गावकर्यांना महावितरणच्या अजब कारभारामुळे विज बिलाचा ‘शॉक’ बसला असून घरगुती वापराचे जुलै महिन्याचे बिले एक ते दोन लाखाची देण्यात आली आहेत. चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेली विजबिले रद्द करावीत अशी मागणी गावकर्यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यात महिलांचा सहभाग आहे.
बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील काही अल्पभुधारक शेतकरी, शेतमजूर, मागासवर्गीय भुमीहीन, मजुरांना जुलै महिन्याचे विज बिल एक ते दोन लाखापर्यंत आले आहे. चुकीच्या पद्धतीने विज बिल आल्यामुळे येथील गावकरी दडपणाखाली आले आहेत. वापर नसतांना लाखोंचे बिले आली, ही बिल भरण्याची क्षमता नसल्याने गावकरी चिंतेत सापडले असून विजबिले तात्काळ रद्द करावीत, लोहगाव येथे कनिष्ठ अभियंता कार्यालय सुरु करावे, लाईनमनचे मंजूर पद भरावे, कर्तव्यात कसुल करणार्या लाईनमॅनची चौकशी करावी, मिटर रिडींग घेणार्या कर्मचार्यांची चौकशी करावी अन्यथा दि. १७ सप्टेंबर पासून लोहगाव येथील स्वातंत्र्य सैनिक चौकात आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा गावकर्यांनी जिल्हाधिकार्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
लाईनमनच्या मनमानी कारभारामुळे शेतीमधील पंप जळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावात एकच लाईनमन कार्यरत आहे. त्यामुळे मनमानी सुरू असून खाजगी व्यक्तीला कामावर लावले जाते. एखादेवेळी दुर्दैवी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. निवेदनावर अमोल गोस्वामी, दत्तात्रय टेंंभुर्णीकर, सुशीलाबाई शेटकर, लक्ष्मीबाई भंडारे,जनाबाई कांबळे, शंकर तरोडे, केरबा गायकवाड, शरद स्वामी, राजू कौडगावे,लक्ष्मण राखे, गजानन वानोळे, भानुदास उमरे, पंढरी वानोळे, रंजना विर,हनमाबाई वाघमारे आदीसह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत.