किनवट, माधव सूर्यवंशी| रविवार (१७ जुलै) पासून किनवट तालुक्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला असून त्याच दिवस्यी सायंकाळी बुधवारपेठ येथिल बळीराम धडंजे यांचा बैल पुरात वाहून गेला. याच नाल्यातून मागिल आठवड्यात वनविभागाचे दोन कर्मचारी पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. नशीब बल्लोत्तर म्हणून सुखरुप बाहेर निघाले.
दूधगाव, कोठारीनाल्पांसह अनेक रस्ते पुन्हा कांहीकाळ बंद झाले होते. रविवार-सोमवारी रात्रभर पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. प्रशासन पंचनाम्याच्याकामी जोमाने लागल्यामुळे सर्ब समस्या समोर येऊ लागल्या आहेत. शुक्रवार व शनिवारी पावसाने उसंती घेतली होती. रविवारपासून पुन्हा पाऊस सक्रीय झाला. रविवार ते सोमवारी रात्रभर सलग जोराचा पाऊस झाल्याने पुलावरुन पुराचे पाणी असल्याने कांहीकाळ मार्ग बंद होते, दुपारनंतर सुरु झाले.
१७ जुलै रोजी बुधवारपेठच्या नाल्यातील पुराच्या पाण्यात बळीराम धडांजेंचा बैल वाहून गेल्याचे आज (१८ जुलै) तलाठी जाधव यांनी सांगितले. कोठारीनाल्यावरील पुलाच्या पाईपांत मोठमोठी लाकडं कोंबून त्यातील पाण्याचा प्रवाह कांही अज्ञातांनी बंद केल्याने पुलावरुन पाणी जात होते. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने दुचाकीसह विद्यार्थ्यांना पाण्यातून प्रवास करणे धोक्याचे झाले होते. प्रवाशांना नदीपार करतांना पन्नास ते शंभर रुपये सहकार्य केल्यानंतर मोजावे लागत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने पाईप सुरुस्त करुन पुलावरुन पूर्ववत वाहतूक चालू केली आहे.