नांदेड| राष्ट्रगुरू श्री समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ श्री क्षेत्र जांब समर्थ येथे इ स 2003 पासून सूरू असलेला श्रीमत् ग्रंथराज दासबोध पारायण सोहळा 20 व्या वर्षी नुकताच थाटात संपंन्न झाला. मराठवाड्यातील अबालवृद्ध स्त्री पुरुष भक्तांनी श्रीमत् ग्रंथराज दासबोध वाचन ग्रंथ पारायण केले. अनेक भक्तांनी येऊन श्री समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनाचा प्रसादाचा सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला.
ज्या श्री समर्थ रामदास स्वामी भक्तांना नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच घरगुती अडचणीमुळे जांब समर्थ येथे प्रत्यक्षात येणे जमले नाही अश्या सर्वदूर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेरील राज्यातून हजारो भक्तांनी आपल्या स्वतःच्या घरी बसून पारायण पूर्ण केले. दैनंदिन कार्यक्रमात श्रीमत् ग्रंथराज दासबोध ग्रंथ पारायणा सोबत प्रभात फेरी, कीर्तन, संगीत प्रवचन, शास्त्रीय संगीत गायन ,भजन, श्रीमत् ग्रंथराज दासबोध अभ्यास वर्ग शिबीर ईत्यादी कार्यक्रम झाले.
श्री समर्थ रामदास स्वामींना आवडणारे कार्यक्रम "मुख्य ते हरिकथा निरूपण" या मधे संगीत अलंकार भागवताचार्य ह. भ. प. श्री मनोहर महाराज मुंढे डाबीकर परळी वैजनाथ यांचे संगीत प्रवचन कीर्तन, तसेच " धन्य ते गायनी कला" मधे संगीत प्रभाकर, अलंकार श्री सखाराम बोरुळ जालना यांचे सितार वादन, संगीत अलंकार सौ सुवर्ण माला कुलकर्णी व डॉ सौ शरयू खेकाळे, मानवत यांचे भक्ती गीत गायन, आणि" संगीत गायन दे रे राम" या मधे संगीत प्रवीण डॉ. सौ सीमा दडके सेलू यांचे शास्त्रीय संगीत आणि अभंग गायन, तसेच राष्ट्रगुरू श्री समर्थ रामदास स्वामींचे एकनिष्ठ सेवेकरी श्री दौलतराम महाराज कंद्राप जांब समर्थ यांचे श्री समर्थ कथा आणि श्री समर्थ रामदास स्वामी कृपाअनुभव कथन या कार्यक्रमा सोबत संगित अलंकार ह. भ . प. श्री शंतनू महाराज पाठक वालूर यांचे काल्याचे कीर्तन असे कार्यक्रम संपंन्न झाले. सर्वांना श्री समर्थ प्रसाद देवून सन्मानित करण्यात आले. या सर्व कलाकारांना तितकीच समर्पक तबला साथ पारायण सोहळा संयोजक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबला वादक तालदास श्री गिरीश सातोनकर यांनी केली.
सर्व कलाकारांनी अप्रतिम असे सादरीकरण केले. गावकरी मंडळींनी उपस्थित राहून लाभ घेतला. या वर्षीच्या सोहोळ्याचा समारोप अन्नदान सेवा भंडारा श्री समर्थ महाप्रसाद वितरण सेवा कार्यक्रमाने यशस्वी झाला. "यज्ञात भवती पर्जन्य हा:" या धर्म आणि वेद वचन या न्यायाने दरवर्षी प्रमाणे याही उत्सवात जोरात पर्जन्य राजाचे आगमन होऊन सर्वांना निसार्गाने सुखकारक अनुभुती देत आनंदाची उधळण केली. आणि श्री समर्थ रामदास स्वामींच्या कृपेने " आनंदवन भुवनी" या कार्यक्रमाचे सार्थक झाले.
श्रीमत् ग्रंथराज दासबोध पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी तन, मन, धनाने सर्वार्थाने सहकार्य करणाऱ्या श्री समर्थ भक्तांसोबत श्री बाबा महाराज मोगरे, श्री मुंजाबा दादा तांगडे, श्री सचिन जोशी, श्री जगन देवकर, श्री बापूसाहेब शिरूरकर, सौ. स्वाती व श्री विवेक चिक्षे, श्री प्रांजळ चिक्षे, श्री सुधाकरराव कुलकर्णी भोगल गावकर, श्रीमती सरुबाई, श्रीमती पुराणिक , श्री प्रसाद पाटील , सौ. जयश्री सातोनकर यांचे मोलाचे योगदान लाभले. मागील एकोणीस वर्षापासून दरवर्षी श्री क्षेत्र जांब समर्थ येथे होणाऱ्या या सोहोळ्यात सहभागी होणाऱ्या भाविक भक्तांच्या भोजन प्रसादाचे आयोजन किराणा, भाजीपाला,आचारी यांना सोबत श्री क्षेत्र जांब समर्थ येथे घेवून जावून केले जाते. श्री समर्थ संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे भिक्षा मागून हे अखंड, अलोकिक असे अविरत प्रयत्न करुन श्री समर्थ रामदास स्वामी सेवा कार्यसूरू आहे.
आपला तबला वादन व्यवसाय सांभाळून हे श्री समर्थ रामदास स्वामी सेवा कार्य श्री समर्थ रामदास स्वामी प्रतिष्ठान संभाजी नगर औरंगाबाद चे संस्थापक अध्यक्ष श्री गिरीश वसंतराव सातोनकर हे करीत आहेत. तसेच संत श्री गुरु श्री सखाराम महाराज संस्थान अमळनेर चे मुख्य सर्वेसर्वा असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संत श्री प्रसाद महाराज अमळनेर पंढरपूर यांनी जांब समर्थ येथील श्रीमत् ग्रंथराज दासबोध पारायण सोहळ्यात येऊन सर्व भक्तांना दर्शन देवून मार्गदर्शन करून आशीर्वाद दिले.