नांदेड। भगवंताने आपल्याला खुप सुंदर आयुष्य दिले आहे या आयुष्याचा आपण उपयोग समाजकार्यासाठी लावावा असे प्रतिपादन भागवत कथाकार चैतन्य महाराज कंधारकर यांनी नांदेड येथे केले. नांदेड येथील हडको भागातील बालाजी मंदिरात आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात ते बोलत होते.
चैतन्य महाराज पुढे म्हणाले, कलियुगात श्रीमद् भागवत कथेला खूप मोठे महत्व प्राप्त झाले आहे. आपल्या जीवनात भागवत ग्रंथातून सांगितलेल्या उपदेशाचा वापर केला तर जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. पाच हजार वर्षानंतरही श्रीमद् भागवत कथा आणि भगवंताचे नाम गायल्या जात आहे. ही एक अलौकिक महिमा प्राप्त झाली आहे. कलियुगात प्रत्येक जीव सुखाचा मार्ग शोधताना दिसत आहे. भगवंताच्या नामाशिवाय सर्वश्रेष्ठ काहीच नाही असे सांगताना प्रत्येकाच्या जीवनात येणाऱ्या प्रसंगाचे उदाहरण दिले. जीवन जगताना माणसाला अनेक चढ-उतार येत असतात.
परंतु प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी भगवंताच्या नामाची गरज आहेच. असे असताना पुढच्या पिढीलाही संस्कार देण्याचे दायित्व आपल्यावर असल्यामुळे ते प्रत्येकाने केले पाहिजे आपण आपल्या मुलावर चांगले संस्कार केले तर आपली भारतीय संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल आणि राष्ट्र टिकला तर तुम्ही-आम्ही टिकू असेही त्यांनी सांगितले आहे. हडको भागातील बालाजी मंदिरात आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.