नांदेड| ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीचे झपुर्झा सोशल फाउंडेशन, परभणी या संस्थेने सादर केलेल्या विनोद डावरे लिखित, दिग्दर्शित "अस्वस्थ वल्ली' या नाटकाने सांगता झाली. २८ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यान चाललेल्या या स्पर्धेत नांदेड केंद्रावर एकूण १४ नाट्य प्रयोगांचे सादरीकरण झाले.
महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. यांची नुकतीच जन्म शताब्दी झाली. आणि पु. ल. देशपांडे यांनी ज्या व्यक्तिरेखा जन्माला घातल्या त्या पैकी काही म्हणजे व्यक्ती आणि वल्ली मधील सात पात्र त्यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त स्वर्गात भेटायला जातात. आणि नाटकाला सुरवात होते. पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेली तेंव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती या वर ती पात्रे बोलतात. त्यांनी तयार केलेलं अजून एक अजरामर व्यक्तिरेखा म्हणजे फुलराणी ती देखील स्वर्गात पोहचते. अतिशय वेगळ्या संकल्पनेने लिहिलेलं हे एक सोज्वळ काल्पनिक नाटक आहे.
यातील फुलरणीची भूमिका साकारणारी ऐश्वर्या डावरे आणि पु. ल. यांची भूमिका साकारणारे महेश जोशी यांनी आप आपल्या पात्रांना योग्य न्याय दिला तर अभिजित कुलकर्णी, अनुजा पालेकर, आकाश जव्हार, सुभाष जोशी, भानुदास जोशी, पृथ्वीराज देशमुख अमोल गोरकट्टे, पवन चौधरी, सागर सुडके, मुकेश दांडगे यांनी आशयानुरूप भूमिका साकारली. कल्पनेला वास्तवाचे रूप देणारे या नाटकाचे नेपथ्य काजल भुसारे यांनी साकारले तर सुस्मिता देऊळगावकर यांची प्रकाशयोजना आणि मयंक परळीकर, विश्राम परळीकर यांचे संगीत नाटकास उंची गाठण्यास सहकार्य करते. ललिता जोशी, ज्योती जोशी यांनी रंगभूषा साकारली तर मोहन भाले आणि संपत्ती डावरे यांनी रंगमंच व्यवस्था सांभाळली.
एकंदर स्पर्धेचा शेवट हा एक उत्तम नाटकाने झाला याचा आनंद रसिक प्रेक्षकांमध्ये दिसत होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी समन्वयक दिनेश कवडे, आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा, नांदेड चे अध्यक्ष अपर्णा नेरलकर, गोविंद जोशी, नाथा चितळे, राम चव्हाण, पूर्वा देशमुख, प्रमोद देशमुख, सुहास देशपांडे, स्नेहा बिराजदार, सुधांशू सामलेट्टी, निवृत्ती कदम, प्रीतम भद्रे, गौतम गायकवाड, संदेश राऊत, सुमित टीपरसे, दीक्षा कुरुडे, या सर्वांचे सहकार्य लाभले. स्थानिक सर्व रंगकर्मी व प्रेक्षकांचे नांदेड केंद्रावरील समन्वयक दिनेश कवडे यांनी आभार मानले व स्पर्धेच्या निकाल संचालनालयामार्फत लवकरच घोषित होईल असे कळवले.