नांदेड| महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत वेगवेगळे विषय, आशय असलेले नाट्य प्रयोग सादर होत आहेत. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी स्वप्नरंग सांस्कृतिक संस्थेच्या वतीने सुदाम केंद्रे लिखित, श्याम डुकरे दिग्दर्शित “टकले रे टकले” या विनोदी नाटकाचे सादरीकरण झाले.
एक गाव आणि त्यातील सर्वच जन टकले. गावावर पाऊस पडावा म्हणून गावकरी टकले करतात पण दोन वर्षापासून गावात पाऊसही पडत नाही आणि गावकर्यांच्या डोक्यावर केसही येत नाहीत. डोक्यावर केस नसल्यामुळे गावकर्यांची उडणारी तारांबळ या नाटकात उत्तम प्रकारे मांडण्यात आली आणि यातूनच सुंदर आणि प्रसंगानुरूप घडणारा विनोद प्रेक्षकांना मनमुराद हसण्यास भाग पाडतो.
सर्व गावकर्यांना गावातील दरसांगवी देवीच्या सहाय्याने अंधश्रद्धेत गुरफटून ठेवणारा तात्यारावची भूमिका सुदाम केंद्रे यांनी उत्तम साकारली तर तात्यारावला सात देणारा गावातील सरपंचाची भूमिका करणारा बळी डीकळे लक्षवेधी ठरला, श्याम डुकरे यांनी साकारलेली मारोतरावची भूमिका, अक्षय राठोड यांनी साकारलेली भिम्याची भूमिका त्यांची देहबोली यातून निर्माण होणारे विनोद प्रेक्षकांना हसवतात. कपिल ढवळे यांनी साकारलेली फुगेवाल्याची आणि वारकाची भूमिका लक्षवेधी ठरली. संदेश राऊत, निवृत्ती कदम, सुदांशु सामलेट्टी, छाया सरोदे, दीक्षा कुरुडे, प्रीतम भद्रे, प्रियंका मोतीपोवळे यांनी आप आपल्या पात्रांना योग्य न्याय दिला तर यातील बाल कलावंत अथर्व देसाई आणि संस्कृती पाटील यांनी साकारलेल्या भूमिका प्रशंसनीय ठरल्या तर तनिष्का घोडके, आरुषी कोमटवार, काव्या जाधव हे बाल कलावंत दाद मिळवून जातात.
यातील गौतम गायकवाड यांनी साकारलेले वास्तववादी गावाचे नेपथ्य आशयपूर्ण आणि सत्याचा आभास नर्माण करणारे होते. रंगभूषा आणि वेशभूषा हे आव्हानात्मक असतानाही स्नेहा बिराजदार आणि पूजा वाघमारे यांनी उत्तम सांभाळली तर प्रकाश योजना – नारायण त्यारे, संगीत – महेश जैन आणि आदित्य डावरे यांनी साकारले. एकंदर स्पर्धेच्या चौथ्या दिवसाने प्रेक्षकांना मनमुराद हासवले आणि स्पर्धेत चुरस निर्माण केले.
दि. ४ मार्च रोजी क्रांती हुतात्मा चॅरीटेबल ट्रस्ट, परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, सुनिता करभाजन दिग्दर्शित “भयरात्र” या नाट्य प्रयोगाचे सादरीकर होणार आहे. दि. ५ मार्च रोजी नटराज कला विकास मंडळ, जिंतूरच्या वतीने अतुल साळवे लीखीती, दिग्दर्शित “धर्मदंड” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.