सदाशिवराव पाटील म्हणजे कार्यकर्त्यांसाठी उर्जास्त्रोत - प्रा.डॉ.सिद्धेवाड -NNL


नांदेड|
सदाशिवराव पाटील म्हणजे राजकीय व सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी उर्जास्त्रोत होते. समाजवादी चळवळीच्या माध्यमातुन शेतकरी, शेतमजूर, कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आंदोलने केली. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी वेगळा ठसा उमटविला होता, असे प्रतिपादन प्रा.डॉ.अशोक सिद्धेवाड यांनी केले. ज्येष्ठ समाजवादी नेते व नांदेड एज्युकेशन सोसायटीचे माजी उपाध्यक्ष कै.सदाशिवराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त दि.3 मार्च रोजी पिपल्स हायस्कूलच्या वतीने सदाशिवराव पाटील व्यक्ती आणि विचार विषयावर आयोजित व्याख्यानमालेत प्रा.डॉ.सिद्धेवाड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी खा.डॉ. व्यंकटेश काब्दे हे होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्यामल पत्की, पिपल्स हायस्कूल शालेय समितीचे अध्यक्ष स.नौनिहालसिंघ जहागिरदार, मुख्याध्यापक पी.पी. रेनकुंटवार आदी उपस्थित होते.

डॉ.सिद्धेवाड पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत संस्कार व सहवास खूप महत्वाचा असतो. सदाशिवराव पाटील यांच्यावर साने गुरुजींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. एस.एम.जोशी, मधु लिमये, जॉर्ज फर्नाडीश, मधु दंडवते यांच्या सहवासातून व मार्गदर्शनातून त्यांनी समाजवादी विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्य केले. राजकारणात व्यक्तीद्वेष असू नये तसेच विकासात राजकारण नसायला हवे, अशी भूमीका त्यांची असायची. संयमी व मितभाषी तसेच तत्वनिष्ठ म्हणून ओळखले जायचे. जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात त्यांचे आदराचे स्थान होते. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष पदावर असतांनाही ते नेहमीच प्राध्यापक, शिक्षक व कर्मचार्‍यांसोबत हितगुज करायचे. विरोधी भूमीका असली तरी ते शांतपणे ऐकून घेत असत. प्राध्यापक व कर्मचार्‍यांना कधीच ते संस्थेचे पदाधिकारी आहेत असे वाटले नाहीत. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता, असे प्रा.डॉ.सिद्धेवाड म्हणाले.

सार्वजनिक जीवनात काम करणार्‍यांनी सदाशिवराव पाटील यांचे जीवन चारित्र सुक्षमपणाने वाचले पाहिजे. श्रमिक, शेतमजूर व कामगारांचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी त्यांनी काम केेले. शेतकर्‍यांचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी त्यांची नेहमीच तळमळ असायची. सरकारच्या कृषी धोरणावर ते नेहमीच टीका करायचे. शेतकर्‍यांना सिंचन, वीज, पायाभूत सुविधा व उत्पादन मालाला मुलभूत किंम्मत मिळाल्याशिवाय शेतकरी स्वावलंबी होणार नाहीत. त्यासाठी सरकारने शेतकर्‍यांचे प्रश्न गांभिर्याने घेवून योजना राबवायला हव्यात, अशी भूमीका त्यांची असायची. तत्व व निष्ठेने शिक्षण संस्था चालविली पाहिजे, शिक्षणाच्या बाबतीत त्यांचा विचार अत्यंत पुरोगामी होता. शिक्षणाचे सार्वत्रीकरण झाले पाहिजे. 

गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले तरच त्यांचे भविष्य उज्ज्वल होवू शकतात, असे त्यांना वाटायचे. शिक्षणाच्या व्यापारीकरणाला त्यांचा कडाडून विरोध होता. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून विकासाच्या प्रश्नावर होणार्‍या प्रत्येक आंदोलनात अग्रेसर असायचे. सदाशिवराव पाटील हे नांदेडचे जयप्रकाश नारायण होते असे म्हटले तरी ते अतिशोक्तीचे ठरणार नाही. वयाने थकले असले तरी ते मनाने तरुण होते. विकासाच्या प्रश्नावर व संस्थेच्या कामा विषयी चर्चा करुन कामे मार्गी कशी लागतील यासाठी त्यांची धडपड असायची. प्रज्ञावंत व विचाराचे व्यक्तीमत्व असलेले सदाशिवराव पाटील हे आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार कायम स्मरणात राहणारे आहेत, असे डॉ.अशोक सिद्धेवाड म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करतांना माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे म्हणाले की, सदाशिवराव पाटील हे पारदर्शक व प्रगल्भ विचारसरणीचे होते. नांदेड जिल्ह्यात समाजवादी विचार वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कधीही त्यांनी पदाचा लोभ केला नाही. विकासाच्या प्रश्नावर त्यांनी राजकारण येवू दिले नाही. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे ते नैसर्गिकरित्या अध्यक्षच होते. संस्थेचे काम अत्यंत ध्येयनिष्ठेने केले आहे. समाजवादी विचार पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केले. त्यांच्यासोबत 30 वर्षाचा सहवास मला मिळाला असून 20 वर्ष संस्थेत एकत्रपणे काम केले आहे. विकासाच्या प्रश्नावर व शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन मिळाले असल्याचे डॉ.काब्दे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पिपल्स हायस्कूल शालेय समितीचे अध्यक्ष स.नौनिहालसिंघ जहागिरदार यांनी शाळेतील विविध उपक्रमांची व नियोजित इमारतीच्या बांधकामाची माहिती दिली. तसेच सदाशिवराव पाटील यांच्यामुळेच मला संस्थेत काम करण्याचे भाग्य मिळाले असून त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रविण पाटील, बनारसजीदास अग्रवाल,  प्रा.बोराळकर, मुख्याध्यापक पी.पी.रेनकुंटवार यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाला द.मा. रेड्डी, शंतनु डोईफोडे, ऍड.चिरंजीवीलाल दागडीया, प्राचार्य यु.डी.गवई, प्रफुल्ल अग्रवाल, अलीभाई पंजवाणी, कैलास काला, दर्शन पप्पु, प्रा.के.डी.जोशी, आरती पुरंदरे, ऍड.प्रदीप नागापूरकर, प्रा.डॉ.लक्ष्मण शिंदे, प्रा.बालाजी कोम्पलवार, कॉ.के.के.जांबकर, गोपाळ पाटील इजळीकर, हरीष ठक्कर, दिनेश राठोड, सुर्यकांत वाणी, प्रा.राजेश सोनकांबळे यांच्यासह इतर मान्यंवर उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी