मंगरूळ, पोटा, कामारी, सवना, सरसम, डोल्हारी आदी सर्कलमध्ये पोलीस चौक्या स्थापन करा -NNL

 हिमायतनगरातील कायदा -सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा


हिमायतनगर, अनिल मादसवार|
तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात होत असलेल्या चोरी, लूटमार, लुबाडणूक, आणि वाढते अवैद्य धंद्यांचे वाढत असलेले प्रमाण लक्षात घेता हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ, पोटा, कामारी, सवना, सरसम, डोल्हारी आदी सर्कलमध्ये पोलीस चौक्या स्थापन करून हिमायतनगर पोलीस ठाण्याला लोकसंख्येच्या मानाने पोलीस कर्मचारी व अधिकारी उपलब्ध करून देण्यासाठी आणि कायदा -सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असून, तेलंगणा- विदर्भाच्या मध्यभागी येणारे शहर आहे. हे शहर माधवारती ठिकाणात असल्याने येथील बाजारपेठ असून, या ठिकाणी रेल्वेस्थानक असल्याने येथे नागरिकांची विविध कामानिमित्ताने ये - जा सुरूच असते. त्यामुळे कोण कुठला आणि कोणत्या कामासाठी तालुक्यात दाखल झाला हे समजाने अवघड झाले आहे. त्यातल्या त्यात गेल्या काही महिण्यापासून शहर व ग्रामीण भागात दिवसागणिक गावागावात चोरी, दरोडे, लूटमार, खून, बलात्कार, विवाहितेचा छळ, दारूमुळे होणारे भांडण तांडे, याबरोबर अवैद्य देशी, विदेशी व हातभट्टी दारूची विक्री, गुटखा, मटका, व्याज बट्टा यासह जुगाराच्या धंद्याने डोके वर काढले आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य मजुरदार आणि शेतकरी, व्यापारी सततच्या चोरी, लुटमार, फसवेगिरीच्या प्रकारामुळे वैतागला आहे. असे प्रकार हिमायतनगर पोलीस ठाणे हद्दीत होत असताना एकही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नसल्याने नागरिकात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

या सर्व घटनांच्या आलेख पाहता घटनाक्रम वाढतच असून, या थांबविण्यात पोलीस दल कमी पडत आहे. खरं पाहता हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, येथील लोकसंख्या ३० हजारहून अधिक आहे. तर तालुक्यात ९२ वाडी तांडे असून, ५२ ग्रामपंचायती आहेत. हि सर्व लोकसंख्या पाहता लाखाहून अधिक संख्या तालुक्याची झाली आहे. एवढी मोठी लोकसंख्या असताना हिमायतनगर पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, २ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ०१ महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ३५ पोलीस कर्मचारी अशी संख्या आहे. खरे पाहत वाढत असलेल्या शहराचा विस्तार आणि ग्रामीण भाग लक्षात घेता या ठिकाणी जवळपास ७० हुन अधिक पोलीस कर्मचारी व ७ ते ८ अधिकारी असायला हवे. तरच तालुक्यातील सर्कलनुसार ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेऊन होणाऱ्या घटनांवर आळा बसून शांतता व सुव्यवस्था कायम ठेवणे शक्य होईल. आजपर्यंत अनेक नेते होऊन गेले मात्र यासाठी एकाही नेत्याने प्रयत्न केले नसल्याने तालुक्यात गुन्हेगारी वाढली आहे.

गुन्हेगारीवर आळा घालायचा असेल तर सुरुवातीला ग्रामीण भागातील मंगरूळ, पोटा, कामारी, सवना, सरसम, डोल्हारी आदी ठिकाणच्या सर्कलमध्ये पोलीस चौक्या स्थापन करून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे. या मुख्य ठिकाणी चौक्या स्थापन झाल्यास तालुक्यात अथवा शहरात बाहेरून ये-जा करणाऱ्या वाहनांसह व्यक्तींवर नजर ठेवणे सोईचे होईल. दुसरे या सर्वच भागात सुरु असलेल्या अवैद्य धंद्यांवर आळा घालण्यास मदत मिळेल. तिसरे म्हणजे चोरी, लूटमार, शुल्लक घटना घडामोडीना आवर घालता येईल. आणि तालुक्यातील शांतात व सुव्यस्था अबाधित राहुल तालुक्यात सौख्य नांदेल. यासाठी या भागातील आजी-माजी राजकीय नेत्यांनी आपसातील मतभेद, उदासीनता व हेवे-दवे बाजूला सारून तालुक्याच्या हितासाठी निर्णय घेऊन पोलीस चौक्या स्थापन करून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संख्याबळ वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी रास्त अपेक्षा जुने जाणकार व सर्व सामान्य नागरीकातून व्यक्त केली जात आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी