नांदेड| शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आधार आवश्यक आहे, गॅसच्या सबसिडीसाठी आधार आवश्यक आहे, स्वतःची ओळख ठरवण्यासाठी आधार गरजेचा. असे असताना मतदाराची ओळख ठरविण्यासाठी आधार लिंक करण्याची आवश्यकता भासत नाही का? असा सवाल "प्रश्न सीमावर्ती भागाचे" अभ्यासक श्री गोविंद मुंडकर यांनी केला आहे.
मुंडकर पुढे म्हणाले की, मतदार नोंदणी सुव्यवस्थित होत आहे यासाठी शासन आणि प्रशासन विशेष जाहिरात करत असतानाचे चित्र दिसून येते. यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पुरवणी वाढते आहे. मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना वैवाहिक बाब, मृत्यू आणि स्थलांतरामुळे होणारी घट ही काळजीपूर्वक नोंद केली जात नाही. यासाठी कुठलीही वातावरण निर्मिती केली जात नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची संख्या वाढते आहे .बोगस मतदारांच्या वाढत्या संख्येमुळे चुकीच्या पद्धतीने निवडून येणार यांचे फावते आहे. यास अप्रत्यक्षपणे शासन-प्रशासन खतपाणी घालत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते आहे.
मुंडकर पुढे असेही म्हणाले की लहान बाळाला जन्मताच त्यास शैक्षणिक प्रवेशासाठी आधारची आवश्यकता आणि त्याशिवाय शाळेत प्रवेश देण्यासाठी मज्जाव केला जातो. शैक्षणिक हक्कासाठी आधार ची आवश्यकता अनिवार्य करण्यात आली आहे. गॅसची सबसिडी मिळण्यासाठी आधार लिंक करण्यात आलेला आहे. स्वस्त धान्य दुकानातही आधार लिंक करण्यात आलेले आहे. कोणत्याही सोयी सुविधा घेण्यासाठी आधार क्रमप्राप्त करण्यात आले आहे. असे असताना चुकीचे मतदार आणि चुकीचे मतदान टाळण्यासाठी आधार लिंक का करण्यात आला नाही? हा यक्षप्रश्न पडल्याचे मुंडकर यांनी स्पष्ट केले. शासनाला बोगस मतदानास प्रोत्साहन द्यावयाचे आहे का ? नसल्यास याविषयी का पाऊल उचलण्यात आले नाही? भविष्यातील निवडणूका निकोप आणि व्यवस्थित होण्यासाठी बोगस मतदार वगळण्यात यावेत शासनाकडून आणि प्रशासनाकडून ही कार्यवाही होत नसल्यास लोकांनी स्वयंस्फूर्तपणे पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.