येथील गांजेगाव पुलाची उंची वाढविण्याची मागणी प्रलंबित असल्याने मार्ग होतोय बंद
पळसपूर/हिमायतनगर, चांदराव वानखेडे/अनिल नाईक| विदर्भ - मराठवाड्यच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी सतत चार दिवसापासुन सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गांजेगावच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे दोन दिवसापासून विदर्भ - मराठवाडयांचा संपर्क तुटून दळणवळन वहातुक ठप्प झाली आहे. हिमायतनगर पळसपुर मार्ग ढाणकी मधील पैनगंगा नदीवर असलेल्या गांजेगाव पुलावर पावसाळ्यात नेहमीच पाणी येत असल्याने उंची वाढवावी अशी मागणी अनेक वर्षपासून केली जात आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे सपशेल दुर्लक्ष झाल्यामुळे गांजेगाव पुल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अजूनही या पुलाच्या मंजुरीची प्रतीक्षा दोन्ही भागातील शेतकरी, गावकर्यांना आहे. म्हणून खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा करून गांजेगाव पुलाची मंजुरी करून पावसाळ्यात वारंवार मार्गबंद होण्याची कटकट दूर करावी अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.
मागील अनेक वर्षांपासून खरीप हंगामात होणाऱ्या अतिवृष्टीच्या पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहातात. त्यातच पैनगंगा नदीत ईसापुर धरणाचे पाणी सोडण्यात येते तर कयाधू नदीचा पुरही पैनगंगेत येऊन मिसळत आसल्यामुळे नदीला महापूर येतो. एव्हाना या पुराचे पाणी गावानजीक नाले, नदीकाठच्या शेतात शिरून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. अश्यावेळी विदर्भ – मराठवाड्याला जोडणारा गांजेगाव येथील पुलावरून पुराचे पाणी येऊन पावसाळ्यात अनेकदा हा मार्ग बंद पडत असतो. जोपर्यंत पुराचे पाणी कमी होत नाही तोपर्यंत दळणवळणासाठी नागरिकांना ३० ते ३५ किमि. दूरचा प्रवास करून आपले गाव गाठावे लागते हे वास्तव आहे. या संदर्भात नांदेड न्यूज लाइव्हने गट ८ वर्षपासून स्टेट बातम्याही प्रकाशित केल्या आहेत. जर हा पूल उंच करण्यात आला तर मराठवाड्यातून विदर्भात जाण्यासाठीचे अंतर या पुलामुळे कमी होऊन वारंवार मार्ग बंद होण्याच्या कटकटीपासून मुक्ती मिळणार आहे.
हा मार्ग म्हणजे विदर्भ- मराठवाडा- तेलंगणा – आंध्रप्रदेश – कर्नाटकला जोडलेला आहे. हा रस्ता ये-जा करणाऱ्या धार्मिक दिंड्यांचा मार्गक्रमणाचा असून, तीर्थक्षेत्र माहूर, बासर, पोहरा देवी येथे भक्तांची आवका – जावक होते. तसेच विदर्भातील नागरिकांना अल्प खर्चातून रेल्वे प्रवास करण्यासाठी जवळचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ राहत असल्याने या मार्गात अडसर ठरलेला पैनगंगा नदीवरील गांजेगावचा पुलाची उंची वाढऊन नव्याने बांधणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच हा पूल कम बंधारा झाला तर वरील भागात पाण्याची पातळी वाढून शेतकऱ्यांना साठून राहणाऱ्या पाण्याचा देखील नक्कीच फायदा होणार आहे. आणि पावसाळ्यात विदर्भ – मराठवाड्याचा संपर्क तुटण्याचे प्रकार थांबतील व दळणवळणातील अडथळे दूर होऊन, समोरील गावांना होणाऱ्या पुराचा धोका टळून गावकरी चिंतामुक्त होतील. दोन्ही विभागातील अनेक गावांना याचा फायदा होईल अशी रास्ता अपेक्षा या भागातील जनतेची आहे.
यासाठी अनेक राजकीय नेत्यांकडे नव्याने पूल उभारून पुलाची उंची वाढविण्यासाठी नवीन पुलास मंजुरी देण्यात यावी अशी मागणी ढाणकी, गांजेगाव, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्लीसह उमरखेड/ हिमायतनगर तालुक्याच्या दोन्ही भागातील गावकऱ्यानि केली होती. मात्र आजवर याकडे कोणत्याही नेत्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनतर नागरिकांनी नवनिर्वाचित खासदार हेमंत पाटील यांच्याकडे मागणी केली. या भागातील नागरिकांची पावसाळ्यात नेहमी पुलावर पाणी आल्याने होणारी अडचण सोडवीन्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्यांसह मुख्यमंत्री, बांधकाम मंत्र्यांनी लक्ष द्यावे. तसेच खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा करून गांजेगावच्या पुलास मंजुरी मिळून आणून भाविक, शेतकरी नागरिकांची पावसाळ्यात होणारी कायमची अडचण दूर करावी अशी रास्ता अपेक्षा या भागातील जनतेतून व्यक्त केली जात आहे.
