खडकी बा. येथील गायरान जमिनीत रोहयोतून शेततळे उभारून मजुरांना काम द्या
हिमायतनगर(प्रतिनिधी)तालुक्यात उद्भवलेली पाणी टंचाई व दुष्काळी परिस्थितीने शेतकरी, मजूरदार व सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. शेतीत कामे नसल्याने मजूरदारांना कामाच्या शोधत परप्रांतात स्थलांतर करावे लागत आहे. हि बाब लक्षात घेता खडकी बा.येथील गायरान जमिनीत शेततळे उभारून मजुरांच्या हाताला काम मिळवून द्यावे अशी मागणी येथील युवकांनी ग्रामसेवकाकडे केली आहे.
अल्प पर्जन्यमानामुळे खडकी बा.परिसरातील पाणी पातळी पूर्णतः खालावली आहे. त्यामुळे पाणी टंचाई ची भीषण समस्या उद्भवली आहे. हि समस्या कायमरूपी सोडवून मजुरांना कामे मिळवून देण्यासाठी येथील गायरान जमिनीत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेततळे उभारावे. जेणे करून शेततळ्यात पाणी साठवून भविष्यात परिसरातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. मजुरांच्या हाताला काम मिळेल आणि पाणी पातळीत वाढ झाल्यास नागरिकांची पाण्यासाठीची भटकंती थांबेल असे निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनावर गौरव सूर्यवंशी, साहेबराव शेट्टे, सतीश मोरे, ज्ञानेश्वर राहुलवाड, साहेबराव मनमंदे, राहुल हनवते, गजानना ठाकरे, तानाजी सोळंके यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत.