पळसपूर येथे ३३ के.व्ही.चे सबस्टेशन उभारण्याची मागणी
हिमायतनगर(वार्ताहर)तालुक्यातील मौजे पळसपूर येथे सर्कलमधील ग्राहकांच्या सोयीसाठी ३३ के.व्ही.चे सबस्टेशन उभारून सुरळीत विद्दुत पुरवठ्यातील सुविधा मिळवून द्यावी अशी मागणी येथील शेतकर्यांनी एका निवेदनाद्वारे अधीक्षक अभियंता हमंद यांच्याकडे केली आहे.
हिमायतनगर येथील ३३ के.व्ही.सबस्टेशन अंतर्गत खडकी बा, घारापुर, दिघी, टेंभूर्णी, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, शेलोदा, सिरंजनी, एकम्बां, कोठा व कोठा तांडा, बोरगडी व बोरगडी तांडा, धानोरा ज, मंगरूळ, वारंगटाकळी, खैरगाव व खैरगाव तांडे, कारला -पिछोंडी, हिमायतनगर, सवना ज, महादापूर, वडगाव ज, सिबदरा, जीरोना, वाशी, यासह अनेक गावे व तांडे या एकाच सबस्टेशन वर अवलंबून आहेत. येथूनच सर्व सर्कलमध्ये विद्दुत पुरवठा केला जात असून, अधिक भर होत असल्याने परिसरातील शेतकरी, नागरिक, व्यापार्यांना वारंवार विदूत पुरवठ्याच्या गैसोईचा सामना करावा लागत आहे. तर कधी कधी अधिकच विद्दुत पुरवठा झाल्यास अनेक वीज उपकरणाच्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. तसेच यातील काही गावे हि विदर्भ - मराठवाड्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या काठावर असून, नदीत उपलब्ध झालेल्या पाण्यावर विद्दुत पंप चालवून शेती केली जाते. यासाठी परिसरातील शेतकर्यांकडे १०, ५, ३ एच.पी.सारख्या विद्दुत पंपाचा वापर करून पिके घ्यावी लागतात. परंतु सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने शेती नुकसानीत आली असून, सामान्यांना विद्दुत पुरवठ्याच्या खंडित पणामुळे अंधाराचा सामना करावा लागत आहे. हि बाब लक्षात घेता यातील अर्ध्या भागाचे एक सर्कल तयार करून पळसपूर येथे ३३ के.व्ही.केंद्र उभारून शेतकरी, कष्टकरी, मजूरदार, सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीच्या निवेदनावर मदनराव जाधव, प्रकाश पाळजकर, राजू भोयर, विठ्ठल गायकवाड, संदीप भोयर, विठ्ठलराव वानखेडे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
मागील अनेक वर्षापासून येथे सबस्टेशन व्हावे अशी मागणी केली जात आहे, परंतु महावितरण कंपनीच्या संबंधिताकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने या भागातील नागरिक, शेतकर्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. आता तरी या समस्येतून मुक्तता देण्यासठी या ठिकाणी सबस्टेशन उभारावे अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे.