हिमायतनगर| येथील महावितरण कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या मोटारपंपाचा वीज पुरवठा खंडित करून अडचणीत आणण्याचा प्रकार सुरू केला जात आहे. अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकरी अतिवृष्टी आणि नुकसानीने हैराण झाल्या असताना आता महावितरणच्या सुलतानी कारभाराचा सामना करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. हा प्रकार महावितरन कंपनीने तात्काळ बंद थांबवावा अन्यथा गोर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रमोद राठोड यांनी दिला आहे.
यंदा नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी नाले तुडुंब वाहून जाऊन शेतातही पाणीच पाणी झाले होते. शेतकऱ्यांनी मेहनतीतून पेरणी केले मात्र पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेती खरडून गेल्या, पिके वाहून गेले, तर पिके पाण्याने सडून गेली यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटातून उभारी घेण्यासाठी शेतकरी रब्बीच्या पेरणीला लागला आहे. खरीप हंगामात नुकसान झाले असताना अस्मानी संकटाला तोंड देत शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीसाठी उधारी उसनवारी करून बियाणे पेरले. मात्र आता महावितरण कंपनीने अडकाठी आणत वीज बिल भरण्याचा तगाजा लावत शेतकऱ्यांचा विज पुरवठा खंडित प्रकार सुरू केला आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी मध्ये पेरलेल्या हरभरा, गहू, करडी, सूर्यफूल यासह इतर पिके वाळू लागले असून, पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हि बाब लक्षात घेता महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी काही दिवसाची मुदत द्यावी. आणि वीज पुरवठा खंडित न करता शेतकऱ्यांना साथ द्यावी. अन्यथा शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन वीज कंपनीच्या विरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. असा इशारा गोर सेनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद बी राठोड यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.