नांदेड| ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ मधील प्रकरण ५ पाच मधील कलम ७४ ते ८१ मधील तरतुदींना अधिन राहून, ग्राहक पंचायत महाराष्ट्र आता मध्यस्थ(मेडियेटर) च्या भूमिकेत असल्याचे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांनी केले आहे.
ग्राहक पंचायत संघटनेचे प्रणेते ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या अथक प्रयत्नानंतर व परिश्रमानंतर या संघटनेचा देशभरात विस्तार झालाआणि या कार्याला लोकमान्यता, राजमान्यता व न्यायमान्यता मिळाली, त्यामुळे संघटनेच्या कार्याची विश्वसनीयता ही वाढली आहे. परिणामी संघटनेच्या कार्यकर्त्यांना एम. आर. सी., जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, जिल्हा ग्राहक आयोग, बी. एस.आय. रेल्वे उपभोक्ता, आदि विविध शासकीय व्यवस्थेत प्रतिनिधित्व प्राप्त झालेले आहे.
शासनाने जिल्हा ग्राहक आयोगमध्ये, मध्यस्थ कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्याद्वारे ग्राहकांच्या प्रलंबित केसेस त्वरित मार्गी लावण्याचा त्यांचा हेतू आहे. व्यापक ग्राहक हितार्थ सामंजस्याने विद्यमान व भावी समस्या सोडविण्याचा हा एक प्रयत्न नक्कीच केला जाऊ शकतो, ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मध्ये अशा स्वरूपाची तरतूद आहे. शासनाने या मध्यस्थ कक्षात ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधीत्व देऊन या प्रलंबित असलेल्या केसेस, आणि नेमणुका त्वरित मार्गी लावाव्यात,असे आवाहन अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी केले आहे.