जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी भेट देऊन केली पाहणी
नांदेड| शहरापासून वाहणाऱ्या आसना नदी पात्रात पूर्णा, वसमत परिसरातील साखर कारखान्यांची मळीयुक्त व रसायनमिश्रित पाणी सोडण्यात आल्याने नदी प्रदूषयुक्त झाली आहे. या प्रदूषणाचा फटका जलचर प्राण्यांना बसला असून, हजारो मासे मृत्युमुखी पडले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील २ वर्षांपूर्वी अश्याच प्रकारे गोदावरी नदीत लाखो मृत माश्यांचा खच पडलेला होता. त्या प्रकारांची चाणाक्ष गुदस्त्यात असताना पुन्हा नांदे शहराजनिक असलेल्या असणं नदीपात्रात मृत माश्यांचा खच दिसून आल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
गेल्या ८ जून पासून मृगनक्षत्र सुरु झाले आहे, त्यानंतर नुकतेच पावसाळा सुरुवात झाली असून, नदीमध्ये पाण्याचा प्रवाह वाहतो आहे. त्याचा बरोबर नदीपात्रात जलचर प्राणी वास करू लागले असून, त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. मंगळवार दि. 6 जूलै रोजी सायंकाळच्या सुमारास नांदेड शहरापासून वाहणाऱ्या आसना नदी पात्रात हजारो माश्यां मृतावस्थेत आढळून आल्या आहेत.
आसना नदीचे पाणी आलेल्या पुरामुळे अचानक लाल व काळे झाले. हा प्रकार नदीकाठच्या शेतकऱ्यांना आणि मासेमारी करणार्यांना आश्चर्य करणारा ठरला. त्यानंतर समजले कि, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील पूर्णा आणि वसमत येथील साखर कारखाने गाळप बंद झाल्याने जून महिन्यामध्ये कारखान्यातील मशीनची साफसफाई केली गेली आहे. त्यामुळे या परिसरात साखर कारखान्यांची मळी मोठ्या प्रमाणात साचत असते. नुकतेच झालेल्या वरील भागाच्या मुसळधार पावसामुळे पूर्णा आणि दुधना नदीना पूर आला. त्या पुराचे वाहते पाणी या भागातील रसायनयुक्त मळीमुळे दूषित होऊन आसना नदीत मिसळले आहे. त्यामुळे आसना नदीतील पाणी दूषित झाले असून, या पाण्याच्या प्रभावाने हजारो मासे मृत झाल्याचे सांगण्यात आले आहे.
ब्राहमणवाडा, त्रिकूट, आमदुरा, दिग्रस या भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांनाही या पाण्याचा फटका बसण्याची शक्यता सायन्स महाविद्यालयाचे मत्स्य विभागाचे प्राध्यापक डॉक्टर किरण शिल्लेवार यांनी व्यक्त केली असून, या प्रकरणाबद्दल नागरीकातून संताप व्यक्त केला. आसना नदी पात्रात रसायनयुक्त पाणी मिसळल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे जलचर प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी भेट देऊन माहिती मागवली असून लवकरच या घटनेचे नेमके कारण समोर येईल असे सांगण्यात आले आहे.