श्री समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाची समाज आणि राष्ट्र उभारणीसाठी गरज- सहस्त्रबुद्धे -NNL


दिल्ली|
खा. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते श्री दासलीला ग्रंथाचे प्रकाशन नवी दिल्ली परिषदेच्या दालनात झाले. "श्री समर्थ रामदास स्वामी हे राष्ट्रगुरु असून आज समाज आणि राष्ट्र उभारणीसाठी त्यांच्या वाङ्मयाची गरज असल्याचे" प्रतिपादन भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष तथा राज्यसभा खा. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.  

ते दासलीला ग्रंथाचे प्रकाशनप्रसंगी बोलत होते. नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमास दासबोध सखोल अभ्यासचे संचालक डॉ. विजय लाड व मोरया प्रकाशनचे दिलीप महाजन यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले की, समर्थ विचारांच्या प्रसार व प्रचाराचे कंकण बांधून, समर्थांचे विचार देशभर पोहचविण्याचे व्रत घेऊन कार्य करणार्‍या या समर्थ सांप्रदायाचे कौतूक आहे. समर्थांचा दासबोध देशाच्या ऐक्यासाठी जीवनभर मार्गदर्शक ठरेल.  स्वा. सावरकर यांनी म्हटल्याप्रमाणे देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो याची अतिशय उत्तम शिकवण समर्थ रामदासांच्या दासबोधातून मिळते.

राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक परिषदेच्या दालनात झालेल्या श्री समर्थ सांप्रदायासाठी एक हृद्यपूर्ण झालेल्या या कार्यक्रमात अविस्मरणीय ठरावा असा झालेला हा सोहळा निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात नुकताच पार पडला.राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष तथा राज्यसभा खा. विनय सहस्त्रबुद्धे यांचे हस्ते श्री दासलीला ग्रंथाचे प्रकाशन नवी दिल्ली येथे नुकतेच झाले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ग्रंथराज दासबोध आणि दासबोध सखोल अभ्यासक्रमाविषयी संचालक डॉ. विजय लाड यांनी माहिती दिली.

मोरया प्रकाशनचे दिलीपराव महाजन यांनी सुस्पष्ट व आकर्षकरित्या तयार केलेल्या श्री दासलीला ग्रंथाची माहिती आणि महती उपस्थितासमोर विशद केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदचे अध्यक्ष खा. विनय सहस्त्रबुद्धे यांचा शाल व ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी खा. विनय सहस्त्रबुद्धे यांनी श्रीसमर्थ सांप्रदायाच्या कार्याचे कौतूक केले.  

भारत सरकारच्या व्यासपीठावर दस्तुरखुद्द दिल्लीत शिवसमर्थांचे स्मरण हेच राष्ट्राचे जीवन या वचनांची आठवण देणारी ती. नानासाहेब देव यांची दीडशेवी जन्मतिथी आणि पू. अक्कास्वामी वेलणकरांची जन्मशताब्दी हा दुग्धशर्करायोग जुळवून आणणारा कदाचित पहिलाच प्रसंग आहे. समर्थभक्तांसाठी अंतःकरणाची समधातता आणि समाधानता मिळवून देणारा हा पहिलाच हृद्य सोहळा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याने जीवन कृतार्थ झाल्याची भावना कार्यक्रमास उपस्थित असलेले सौ. सुरेखा महाजन, सौ. रंजना पाटील, सोमनाथ पाटील, शोभना मुदिराज, पूजा साल्पेकर पीयुष गिरगावकर आदींनी व्यक्त केली. या कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी