हिंगोली| एकनाथ शिंदे गटात सामील झालेले बंडखोर आमदार संतोष बांगर यांना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. यानंतर आ.संतोष बांगर आक्रमक झाले असून मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यासाठी ते समर्थकांसह मुंबईसाठी रवाना झाले आहेत. मला कोणीही जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवू शकत नाही असा म्हणत त्यांनी एबीपी माझाशी बोलताना थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना माझी शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाली होती. मी कोणतीही चूक केलेली नाही. मला पदावरुन हटवण्यात आल्याचं आज बातम्यातून पाहिलं आहे. पण मी पदावरुन हटलेलो नाही. मी आजही शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे आणि उद्याही राहणार असं आ संतोष बांगर म्हणाले आहेत. कोणीतरी उद्धव ठाकरेंची दिशाभूल करत आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला.
मला उद्धव ठाकरेंना इतकंच सांगायचं आहे की, दिशाभूल करणाऱ्यांना बाजूला करा. प्रत्येक गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला आपण खरंच चांगले नेते आहात. आम्ही शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला मतदान केलं असून कोणतीही चूक केलेली नाही. किमान १२ खासदार आमच्या मुख्यमंत्र्यांकडे येणार आहेत. ५० पेक्षा जास्त जिल्हाप्रमुखांच्या मी संपर्कात असून, त्यांनी आम्ही तुमच्या बाजूने असल्याचं सांगितलं आहे. अनेक तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख देखील संपर्कात आहेत. याशिवाय शिवसैनिक, शाखा प्रमुख यांनाही भाजपा सोबतची नैसर्गिक युती मान्य आहे असंही संतोष बांगर यांनी म्हंटल आहे.