किटकनाशक फवारणी करतांना शेतकऱ्यांनी अशी घ्यावी काळजी - कृषि विकास अधिकारी डॉ.टी.जी. चिमणशेट्टे -NNL


नांदेड, अनिल मादसवार|
पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून शेतकरी किटकनाशकांची फवारणी करतात. शेतात किड, रोग किंवा तणाचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी विविध रासायनिक औषधे फवारतात. ही रासायनिक औषधे फवारतांना मुख्यत तीन प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकावर फवारणी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी  डॉ. टी.जी. चिमणशेट्टे यांनी केले आहे. 

शेतात किटकनाशके, तणनाशके वापरतांना घ्यावयाची काळजी : रासायनिक औषधाचे अत्यंत बारीक कण श्वासोश्वासासोबत शरीरात जातात. फवारणी करीत असतांना त्वचेच्या संपर्कामधुन तथा डोळयाद्वारे शरीरात जातात. फवारणी करतांना नकळत तोंडाद्वारे खातांना  बीडी  पितांना शरीरात जाऊ शकतात.

किटकनाशके फवारणी करतांना सर्वसाधारणपणे घ्यावयाची काळजी : गळके फवारणी यंत्र न वापरता ते दुरुस्त करुन वापरावे. किटकनाशके फवारणी यंत्रात भरताना सांडू नये यासाठी नरसाळयाचा (चाडीचा) वापर करावा. तणनाशके फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा. तो पंप किटकनाशके वापरतांना संरक्षण कपडे वापरावेत. फवारणीसाठी  वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवून ठेवावेत. झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत. किटकनाशकाला हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे. फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब दांडयाचा किंवा काठीचा वापर करावा. किटकनाशके पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रण करताना अथवा फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे. फवारणीचे काम पुर्ण झाल्यावर हात साबनाने स्वच्छ धुवून खाणे -पिणे करावे. 

फवारणीच्या वेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासून दुर ठेवावे. उपाशीपोटी फवारणी न करता फवारणीपुर्वी न्याहारी करावी. फवारणी करतांना वापरलेली भांडी इ. साहित्य नदी, नाला किंवा विहीरी जवळ धुवू नयेत. तर धुतांना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडी  जमिनीत अथवा मातीत गाडावे. किटकनाशक रिकाम्या बाटल्या वापरानंतर नष्ट करुन टाकाव्यात. फवारणी करतांना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढू नये. यासाठी सोयीस्कार तार, काडी किंवा टाचणी वापरावी. किटकनाशक फवारतांना अंगावर पडू नये म्हणून वाऱ्यांच्या विरुध्द दिशेने फवारणी करु नये. किटकनाशक फवारतांना संरक्षक पोशाख, चष्मा, हातमोजे यांचा वापर केल्याशिवाय फवारणी करु नये.

किटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरण्यास किमान दोन आठवडे जावू देऊ नये. जमिनीवर सांडलेले किटकनाशक हातांनी न पुसता व त्यावर पाणी न टाकता ती माती / चिखल यांच्या साहयाने शोषुन घ्यावेत व जमिनीत गाडून टाकावीत. डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे कळजीपुर्वक लक्ष घ्यावे. लाल रंगाचे चिन्ह / खुणा असलेली औषधी विषारी असून त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा कृम लागतो. कृषि विद्यापीठाने पिकास शिफारस केल्यानुसार किटकनाशक मात्रा वापरावी, जास्त मात्रा वापरु नये. एका पेक्षा जास्त किटकनाशकाचे मिश्रण फवारणी करतांना वापरावे टाळावे. किटकनाशक फवारणीसाठी वापरतांना व खरेदी करतांना त्याची अंतिम मुदत तपासावी.

विषबाधा झाल्याची लक्षणे व उपाययोजना : विषबाधा ही किटकनाशके / तणनाशके यांचा त्यांचेशी संपर्क किंवा पोटात गेल्यास होते. विषबाधा व इतर आजार यांच्या लक्षणात बरेचदा साम्य राहू शकते.

विषबाधाची लक्षणे : अशक्तपणा व चक्कर येणे. त्वचेची जळजळ होणे, डाग पडणे, घाम येणे. डोळयाची जळजळ होणे, पाणी येणे, अधुंक दिसणे. तोंडातून लाल गळणे, तोंडाची आग होणे, उलटी येणे, मळमळणे, हगवण होणे, पोटात दुखणे. डोकेदुखी, अस्वस्थ होणे, स्नायुदुखी, जिभ ळुली पडणे, बेशुध्द होणे, धाप लागणे, छाती दुखणे, खोकला येणे.

विषबाधेची शंका असल्यास खात्री करा : रोग्याचा  किटकनाशकांसह संपर्क आला होता काय? नेमके कोणते किटकनाशके वापरले? शरीरात किती गेले? व केंव्हा गेले? डॉक्टरांसाठी  वरील माहिती महत्वाची आहे.

विषबाधेवर तातडीने करावयाचे प्रथमोपचार : किटकनाशके / तणनाशके डोळयांत उडाल्यास, तात्काळ डोळे स्वच्छ पाण्याने 5 मिनीटापर्यंत पाण्याची धार सोडून धुवावे. शरीरावर उडाले असल्यास 10 मिनिटे साबणाने स्वच्छ धुवावे व दवाखान्यात न्यावे. विषबाधे नंतर रोगी जर पुर्ण शुध्दीवर असेल तरच उलटी करण्यास प्रवृत्त करावे. अन्यथा 3 चमचे बारीक लाकडी  कोळसा भुकटी करुन अर्धा ग्लास पाण्यातून पाजा व लगेच दवाखान्यात न्या. विषारी औषध कपडयावर उडाले असल्यास ते कपडे लगेच बदला व रोग्यास शक्य तितक्या लवकर दवाखान्यात पोहचवा.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी