महावितरण आपल्या दारी आले ही भाग्याची गोष्ट आकोडे टाकून वीज वापरणे हे दुर्दैव - अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी -NNL

विविध कार्यक्रमांनी रंगला ऊर्जा महोत्सव


नांदेड। 
मागील काही दशकातील विजेची स्थिती पाहता आज विद्युत क्षेत्रात मोठी क्रांती झाल्याचे मान्यच करावे लागेल. आपल्या जीवनात प्रकाश पोहोचवण्यासाठी महावितरण आपल्या दारी आले आहे ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे असे मनोगत अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दिनांक 29 जुलै रोजी मोठ्या उत्साहात उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य पॉवर ॲट 2047 या संकल्पनेतून महावितरणच्या वतीने ऊर्जा महोत्सव संपन्न झाला. या महोत्सवाचा अध्यक्षीय समारोप करताना श्री परदेशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मी रॉकेलचा दिवा, स्टंगस्टनचा दिवा पाहिलेला आहे. विजे विना ग्रामस्थांचे जीवन काय असते याची अनुभूती मी स्वतः घेतलेली आहे. त्या दृष्टीने आजचा काळ हा एक ऊर्जा क्रांतीचा काळ आहे हे मान्य करावे लागेल. ग्राहकाभिमुखतेच्या दृष्टीने शासन हे विकासात्मक योजना राबवत असते त्याचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवं. सौर कृषी पंप ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवणारी योजना आहे. यामुळे दिवसा विजेचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे शाश्वत सिंचन करणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. कोरोनाच्या महामारी मध्ये माझा मुलगा अखंडित विजे मुळेच शिक्षण घेऊ शकला, असे सांगत श्री परदेशी म्हणाले की पूर्वजांच्या कर्तबगारीवरच आज आपण जगत आहोत. ही बाब दुर्लक्षित न करता येणारी आहे. वीज चोरून वापरणे, वापरलेल्या विजेचे बिल न भरणे या गोष्टी आपण टाळायला हव्यात.

 महावितरणचा लाईनमन उन्हा पावसात आपल्याला वीज पुरवण्यासाठी प्रयत्न करत असतो. वीज खंडीत झाल्याच्या  काळात लाईनमनला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमास नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री दत्तात्रय पडळकर, केंद्र शासनाच्या पॉवर फायनान्स कार्पोरेशनचे समन्वयक श्री रविंद्र रेंगडे, महावितरणच्या नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री सुधाकर जाधव, महापारेषणचे अधीक्ष्क अभियंता श्री मिलींद बनसोडे, प्रभारी अधीक्षक अभियंता श्री सुनिल वनमोरे, त्याचबरोबर श्री सुशील पावसकर, तौसिफ पटेल, महापारेषणचे कार्यकारी अभियंता श्री माधव सोनकांबळे, श्री पवार, श्री कुलकर्णी, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री अभीमन्यू राख, श्री श्रीनिवास चटलावार प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्य अभियंता श्री पडळकर यांनी राज्यात व परिमंडळात झालेल्या विद्युतीकरणावर प्रकाश टाकला. तसेच भविष्यात विजेच्या क्षेत्रात होणारा बदल स्पष्ट करत सौभाग्य योजने अंतर्गत नांदेड जिल्हयातील 28 हजार कुटूंबियांना प्रकाश पोहचवण्याचे काम करण्याची संधी प्राप्त झाली याचा आनंद आहे. आज रोजी नांदेड जिल्हयात 2100 कोटी रूपयांची थकबाकी आहे. त्यामुळे उदयासाठी वीज हवी असेल तर आज विकलेल्या प्रत्येक युनीटच्या बिलाची वसुली झाली पाहिजे असे स्पष्ट करत दरमहा वीजबील भरण्याचे आवाहन केले. या प्रसंगी महावितरणच्या विवीध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यी श्री संभाजी लूकूडवार, श्री गजानन हेंडगे, परमेश्वर शिंदे,श्री पांडूरंग चेलकेवार तसेच श्री चेलकेवाड यांनी  मनोगते व्यक्त करत आमच्या जीवनात प्रकाश निर्माण केला असे गौरवोउदगार काढत महावितरणला धन्यवाद दिले.

ऊर्जा विभागाच्या विविध कामांची चित्रफीत, प्रमोद देशमूख यांचे पथनाट्य, मोतीराम जोंधळे यांनी कलापथकाव्दारे ऊर्जा विषयक जनजागृती असा भरगच्च कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रास्ताविक सादर करत अधीक्षक अभियंता श्री सुधाकर जाधव यांनी नांदेड जिल्हयात गेल्या आठ वर्षात झालेल्या कामांची माहिती दिली.कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन प्रमोद देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन धनंजय पवार यांनी केले.कार्यक्रम यशश्वितेसाठी अभियंते श्री स्वप्नील जोशी, श्री नारायण मार्लेगावकर, श्री जनार्दन चौधरी, श्री प्रमोद क्षीरसागर, श्री गट्टूवार, श्री दंडगव्हाण व जनमित्रांनी परिश्रम घेतले. यावेळी नायगाव उपविभागातील लाभार्थी ग्रामस्थ तसेच महावितरणचे सर्व अभियंते, अधीकारी व जनमित्र मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी