अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...!
शिवणी, प्रकाश कार्लेवाड। किनवट-माहूर तालुक्याचे आमदार मा.भीमराव केराम यांनी जिल्हा प्रशासणास पत्र देऊन किनवट/माहूर तालुक्यात मागील सहा दिवसापासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन जन जीवन विस्कळीत झाले आहे. या साठी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे करून यांना सर्वोपरी मदत करण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्याकडे केली आहे.
या अनुषंगाने मागील सहा दिवसापासून इस्लापूर-शिवणी अप्परावपेठ मंडळात २०० मि.मी पेक्षा जास्त पाऊस झाले असल्याने इस्लापुर, शिवणी, अप्पारावपेठ मंडळाला ओला दुष्काळ जाहीर करावे असे मत आता शेतकरी वर्गातून होत आहे. ईस्लापुर शिवणी व अप्पारावपेठ परिसरातील शेतीत सर्वत्र पाणीच पाणी झाले असून कापूस,सोयाबीन पिके पाण्यात कोमेजून जात आहेत आणि सतत च्या मुसळधार पावसाने नाल्या लगतची शेती खरडली असून पिके वाहून गेली आहे.मागील दि.०७ जुलै पासून या भागात सुर्यदर्शन देखिल झाले नाही. ईस्लापूर,शिवणी व अप्पारावपेठ परिसरात एकंदरीत १ जुलै पासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
तर दि.०७ जुलै ते १२ जुलै मंगळवार पर्यंत या भागात पावसाने कहर केला आहे.गेली पाच दिवसापासून या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अणेक गावांचे संपर्क तुटले आहेत.तर शिवणी-इस्लापुर या मार्गावर असलेल्या इस्लापुर जवळील रेल्वे च्या पुलाखाली भरगच्च पाणी साचल्याने हा महामार्ग सध्या बंद आहे. या सोबतच शिवणी परिसरातील अप्पारावपेठ या गावालगत असलेल्या तेलंगणा राज्यातील सुवर्णा प्रकल्प च्या पाण्याची पातळी धोक्येच्या सिमारेषेच्या वर गेल्याने अप्पारावपेठ या गावाच्या अवती भोवती तळ्याचे पाणी वेढले असून गावाला विखळा घातले आहे.या कडे प्रशासकीय यंत्रणाला विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
सोबतच अप्परावपेठ,अंदबोरी, पांगरपहाड व तल्हारी या गावांना जाणाऱ्या रस्त्यावरील पुलांची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. या मुळे या गावांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे.शिवणी व अप्पारावपेठ या भागात दि.०७ जुलै पासून संत्ततधार कोसळत असलेल्या पावसाने शेतीचे धुरे,बांध, नाल्या,फुटून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या परिसरातील नाल्या लगतची शेतीतपाणी घुसून शेती खरडली असून ऊभे पिके वाहून गेली आहे. शेतातील गाळ मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
त्याच बरोबर कापूस, तूर, सोयाबीन ही कोवळी पिके पाण्याखाली दबली आहे यामुळे पिके पिवळी पडू लागली आहे. तरी महसूल विभागाकडून या भागातील नुकसानीची पाहणी करून तात्काळ या भागाला ओला दुष्काळ जाहीर करावा व तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाड्यातील किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ गाव तेलंगणा राज्यातील स्वर्णा प्रकल्पाच्या तलावामुळे अप्पारावपेठ या गावच्या भोवती तळ्याचे पाणी वाढत असल्याने अप्पारावपेठ गाव धोक्यात आले आहे.
मागील एक आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे किनवट माहूर तालुक्यामध्ये परिस्थिती गंभीर निर्माण झाली असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून आप्पारावपेठ येथे देखील अशीच परिस्थिती निर्माण झालेली पाहावयास मिळत आहे तेलंगणा राज्यातील सुवर्णा प्रकल्पचे बॅक वॉटर पार मलकजाम पर्यंत आले असून आप्पारापेठ गावचा संपर्क तुटला आहे अप्पारापेठ गावच्या भोवताल सर्वत्र पाणीच पाणी झाले असून प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित तेलंगणा राज्यातील जिल्हा प्रशासनाला ही बाब कळवून सुवर्णा प्रकल्प डॅमचे दरवाजे उघडायला सांगावे अशी मागणी येथिल माजी जिल्हा परिषद सदस्य सुर्यकांत आरंडकर,सरपंच शेख अब्दुल रब व येथील पोलीस पाटील रेड्डी यांनी किनवट चे तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्याकडे फोनद्वारे विनंती केली आहे.आपारापेठ भागामध्ये झालेल्या पूर परिस्थितीची सर्व माहिती पोलीस पाटील भूमारेड्डी लोकावार यांनी किनवट च्या तहसीलदार मृणाल जाधव यांना दिली आहे.