नांदेड| राष्ट्रीय स्तरावर देशभक्तीसह सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्य करणारी जय भारत माता सेवा समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष हवा मल्लीनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती आणि जगाला अहिंसा परमोधर्माची शिकवण देणारे भगवान महावीर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
१४ एप्रिल रोजी तालकटोरा इनडोअर स्टेडियम नवी दिल्ली येथे सकाळी ११ वाजता राष्ट्रगीताने सुरू झालेल्या या भव्य सोहळ्यात देशातील विविध राज्यांतील मान्यवर उपस्थित होते. जगाला शाश्वती, सद्भभाव आणि समानतेचा संदेश देणारे भगवान महावीर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.
कर्नाटकातील आळंदचे माजी आमदार बी.आर. पाटील, जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते वैजनाथ झळकी, राष्ट्रीय उपाध्यक्ष किशनपाल यादव, राष्ट्रीय सदस्य सिध्दार्थ तलवारे, प्रसिध्द साहित्यिका डॉ. तसनिम पटेल आणि अवयवदानाचे महत्व सांगणारे जेष्ठ पत्रकार माधव अटकोरे यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन प्रसिध्द वकिल नविनसिग यांनी केले. या कार्यक्रमात श्री श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज सेवाभावी संस्था बिलोली जि. नांदेड (महाराष्ट्र) या संस्थेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीयरत्न पुरस्कार श्री श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यात सर्वश्री डॉ. अनिल सूर्या, डॉ. तसनिम पटेल, किशनपाल यादव, ऍड. वैजनाथ झळकी, शहाजीराव पाटील, विवेक सुरवाडे, दिपक पाटील, अशोक झगडे, ऍड. केशव राजे निंबाळकर, माधव अटकोरे, डॉ. राहूल कांबळे, विजयकुमार उजेडकर, शशी शेटकार आदींना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. लाखो प्रेक्षक बसण्याची क्षमता असलेले तालकटोरा स्टेडियम खचाखच भरले होते. यावेळी अनेकांनी मल्लीनाथ बाबांच्या देशभक्ती आणि सामाजिक सेवेवर भरभरून विचार मांडले. दिवसभर चाललेला कार्यक्रम पाहण्यासाठी दिल्ली येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आभार प्रदर्शन राष्ट्रीय सचिव दासराव हंबर्डे यांनी केल्याचे जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय सदस्य सिद्धार्थ तलवारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.