आ. अमरनाथ राजुरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास आश्वासन
नांदेड| जिल्हा परिषदेच्या खाजगी जागेत चालणाऱ्या अनेक शाळांचे भाडे खूप वर्षापासून थकित असलेले भाडे अदा करण्यात येतील यासह शिक्षण विभागातील उर्वरीत प्रश्न तात्काळ सोडवू असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिले. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार आ. अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.
जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागाच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना एका लेखी निवेदनाद्वारे विनंती केली होती. यासंदर्भात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी तात्काळ दखल घेऊन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र दिले. व त्यासोबतच शिक्षणमंत्र्यांना हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्यक्ष भेटण्याच्या सूचना केल्या.
त्यानुसार काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते आ. अमरनाथ राजूरकर, शिक्षक आ. विक्रम काळे, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत ज्या जिल्हा परिषद शाळा खासगी जागेत चालू आहेत. त्यांचे थकलेले भाडे देणे, निजामकालीन जीर्ण झालेल्या शाळा पाडून त्या ठिकाणी नवीन इमारती बांधणे, आर.टी.ई. कायद्यानुसार शासनाकडे थकलेली रकम देणे या विषयावर चर्चा करण्यात आली. या सर्व बाबींसंदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात येतील, असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिष्टमंडळाला दिले.