ग्रामपंचायत पळसपूर ग्रामसभा ठरावाला केराची टोपली दाखवून रेती घाटाचा झाला लिलाव -NNL

प्रशासनाचा लपर्वाह कारभार पुढे आल्यानं पळसपूर येथील गावकरी झाले आक्रमक


हिमायतनगर, अनिल मादसवार|
विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठावर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर येथील वाळू उपसा करण्याचा लिलावासाठी पळसपूर ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन दिलेल्या ठरावाला केराची टोपली दाखवून रेती घाटाचा लिलाव झाला आहे. यामुळे ग्रामस्थांनी वाळू उपश्याला विरोध केला असून, चक्क रस्ता अडवून प्रशासनाच्या नाकर्तेपणा व मनमानी कारभाराचा विरोध केला आहे. त्यामुळे रेती घाटाचा लिलाव वादाच्या भोवऱ्यात अडकला असून, प्रशासनाचा लपर्वाह कारभार पुढे आल्यानं गावकरी आक्रमक झाल्याचे समोर आले आहे.

हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या पैनगंगा नदीकाठावरील अनेक गावचा लिलाव मागील महिन्यात संपन्न झाला. लिलाव झाल्यानंतर देखील आत्तापर्यंत बहुतांश ठिकाणच्या घाटाच्या रेती उपसा करण्याला रितशीर परवानगी दिल्या गेली नाही. लिलाव होण्यापूर्वी तालुक्यातील पळसपूर ग्रामपंचायतीने दि. ३० आगस्ट २१ ला ग्रामसभा लावून गट क्रमांक ५१ ते ५४ साठी लिलाव करण्यास शर्ती व अटींच्या अधीन राहून हरकत नाही असा ठराव दिला होता. त्यामध्ये पर्यावरण विभागाची मंजुरी घेऊन कमीत कमी उपसा करण्यात यावा. रेतीची वाहतूक गावच्या बाहेरील रस्त्याने करण्यात यावी. गांजेगाव बंधाऱ्याची पाणी  पातळी सुरक्षित ठेवण्यात यावी अश्या अटीं टाकण्यात आल्या होत्या.

त्यानंतर नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात लिलाव प्रक्रिया पार पडली. मात्र हिमायतनगर रेती माफियांनी महसूल अधिकाऱ्यास हाताशी धरून दुसरा गट क्रमांकातील पेंडाचा लिलाव देण्याचा प्रताप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने दिलेल्या लिलावाच्या ठरावाला विचारात न घेता लिलाव देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी लिलाव देण्यात आला त्या ठिकाणाहून कोपरा येथील पाणी पुरवठ्याची विहीर आणि पाईप लाईन आहे. जर या ठिकाणाहून रेतीचा उपसा झाला तर पाणी टंचाईची भीषण समस्यां उद्भवणार असून, त्यामुळे आज दि.१७ गुरुवार रोजी रेती काढण्यासाठी आलेली वाहने पळसपूर येथील ग्रामस्थानी अडवून प्रशासनाच्या कारभाराचा विरोध केला आहे. यावेळी डॉ.प्रकाश वानखेडे, पोलीस पाटील शंकर वनखेडे, कल्याण वानखेडे, माधव देवसरकर, सुनील वानखेडे, निवृत्ती वानखेडे, देवानंद वानखेडे, संजय वानखेडे, निर्गुण जाधव, कैलास जाधव, मारोती जाधव, दिलीपराव माने, जागदेराव बोंबीलवार, संदीप कदम, रावसाहेब वानखेडे, राज चांदलकर आदींसह शेकडो शेतकरी व गावकरी उपस्थित होते.  

गावकर्यांनी रेतीची वाहने अडविल्याचे समजताच महसूलसचे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन पळसपूर गाठून गावकर्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन तास चर्चा झाली. यावेळी गावकर्यांनी जेथून रेती उपसण्याचा ठराव दिला त्याचा ठिकाणाहून रेती काढावी असा आग्रह धरला. त्यामुळे रेतीचा झालेला लिलाव वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता या संदर्भात तहसीलदारांना आपली भूमिका मांडून रेती लिलावाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. 

शेतकऱ्यांनी शेतीमध्ये घेतलेले ऊस अद्यापही कारखान्याने नेला नाही, त्यामुळे शेतकरी अगोदरच हैराण झालेले असताना आता महसूल विभागाने दिलेल्या ठिकाणचा लिलाव न करता दुसऱ्याच गटाचा लिलाव केल्या गेल्याने शेतकरी व महसूल विभागात जुंपली असल्याचे यावरून स्पष्ट होते आहे. त्यामुळे आता महसूल विभागाला अगोदरच लिलाव रद्द करून रेतीसाठी ठरावा नुसार दिलेल्या गट क्रमांक असलेल्या रेती घाटाचा लिलाव करावा लागणार..? आहे. याबाबत तहसीलदार डी.एन.गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा फोन बंद होता. तर मंडळ अधिकारी राठोड म्हणाले कि, ग्रामपंचायतीला फक्त ना हरकत प्रमाणात देण्याचा अधिकार आहे, गट क्रमांक नदीकाठचे सर्वे नंबर ठरविण्याचे जीआर नुसार अधिकार तहसीलदार याना असतात असे ते म्हणाले.    


शेतकऱ्यांनी रेती उपसा करण्यासाठी जाणाऱ्या वाहनांना मनाई करून दोन ते तीन तासापासून रास्ता अडविला होता. त्यानंतर पोलीस व महसूल अधिकारी गेल्यानंतरही शेतकऱ्यांनी रेती उपाश्याला विरोध केला आहे. त्यामुळे रेती काढण्यासाठी गेलेली वाहने परत आल्याने तूर्तास तरी पळसपूर रेती घाटाच्या उपश्याचा वाद शमला असून, यावर प्रशासन काय...? तोडगा काढते हे पाहावे लागणार आहे.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी