नांदेड| भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृषि विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने धान्य महोत्सव-2022 च्या अनुषंगाने विकेल ते पिकेल अभियाना अंतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा 20, 21 व 22 मार्च 2022 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात सकाळी 10 ते सायं 6 वाजेपर्यंत आयोजीत केला आहे. या धान्य महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
या धान्य महोत्सवात भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य वर्षानिमित्त 75 भव्य शेतमाल विक्री केंद्र असणार आहेत. यात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल गहु, ज्वारी, तांदूळ, तुर, मुग, उडीद, चनाडाळ, हळद, मिरची, मसाले, विविध प्रकारचे सेंद्रीय उत्पादने (गुळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी) तसेच नाविन्यपूर्ण उत्पादने जसे, मध, गुळाचा पाक व महिला बचतगटांची उत्पादने (चटणी, लोणचे, पापड, कुरडई इत्यादी), टरबुज, खरबुज आदी फळे व भाजीपाला थेट विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.
जिल्ह्यातील ग्राहकांनी या महोत्सवास भेट देऊन शेतकऱ्यांकडुन शेतमाल खरेदी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.