एकीकडे मराठवाडा विदर्भात प्रचंड अतिवृष्टी आणि दुसरीकडे इसापूर धरण प्रशासनाचा हलगर्जीपणा आता शेतकरी बांधवांच्या जीवावर बेतत आहे.आम्ही सतत म्हणतोय शेतकऱ्यांना तातडीने पुरेशी मदत करा, मात्र अद्याप सरकारचे तरीही दुर्लक्षच !
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे १००% नुकसान झाले आहे. वर्षभराचे परिश्रम पाण्यात गेल्यामुळे राज्यभर आकांडतांडव पसरला आहे. मात्र तरीही राज्य सरकारकडून कसलीही तातडीने मदत नाही. सोयाबीन पूर्णपणे वाया गेलेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश आतातरी सरकारला ऐकू येईल का ? शेतकऱ्यांचे अत्यंत अतोनात नुकसान झालेले असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मात्र शेतात जाण्याची तसदी देखील घेतली नाही. उलट कार्यालयात बसूनच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेच नसल्याचा अहवाल सादर केला आहे.
आधीच्याच नुकसानाचे पंचनामे अद्याप अर्धवट आहेत, त्यातच आताच्या अतिवृष्टीच्या संकटाने पुरत्या कोलमडलेल्या शेतकऱ्यांपुढे जीवनमरणाचा प्रश्न उभा आहे, त्यामुळे कुठल्याही पंचनाम्याशिवाय तात्काळ आर्थिक मदत जाहीर करा आणि ती गरजूंपर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्यावी.. ईसापुर धरण प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे धरण शंभर टक्के भरल्याशिवाय धरणाचे दरवाजे उघडे केले नाहीत. धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे नदीपात्रात पाणी मोठ्या प्रमाणात घेऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली. पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात धरणाचे पाणी घुसले,दोन दिवस सतत अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीला मिळणार्या इतर नदी-नाल्यांच्या पुराच्या पाण्यामुळे हदगाव हिमायतनगर उमरखेड या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदतीची फार गरज आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक वाहून गेल्याचे दुःख सरकारला मंत्रालयात बसून समजणार नाही. आश्वासनांचा बाजार मांडणं आतातरी सरकारने बंद करून, नुकसानग्रस्त शेतकरी बांधवाना त्वरित आर्थिक मदत करावी.
भागवत देवसरकर, प्रदेशाध्यक्ष,पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद महाराष्ट्र राज्य.