ग्रामीण भागातील आरोग्याच्या सेवा सुविधांसाठी कटिबध्द - पालकमंत्री अशोक चव्हाण -NNL

रोहिपिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतींचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन



नांदेड, अनिल मादसवार| जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सुविधा या बदलत्या काळाच्या गरजांप्रमाणे अधिक भक्कम व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने आवर्जून लक्ष दिले आहे. गावकऱ्यांना पंचक्रोषीतच उत्तम सुविधा मिळाव्यात या दृष्टीने रोहिपिंपळगाव येथे एक कोटी 80 लक्ष रुपयांची नवीन इमारत साकारत असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

मुदखेड तालुक्यातील मौजे रोहिपिंपळगाव येथील इमारतीच्या भूमिपूजन संभारंभानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रामराव नाईक, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, गोविंदराव शिंदे, जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणाताई कल्याणे आदि मान्यवर उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागाशी गत पन्नास वर्षांपासून चव्हाण परिवाराने विविध विकास कामांच्या माध्यमातून भावनिक स्नेह जपलेला आहे. स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी ग्रामीण विकास व आरोग्याच्या सुविधेबाबत तळमळीने जे काम केले त्याचे आपण सर्वच साक्षीदार आहेत. त्यांची कटिबध्दता मी कृतज्ञतेच्या भावनेतून जपत आलो आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी त्याकाळची लोकसंख्या डोळ्यापुढे ठेवून स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी या गावाला 1980 ते 1985 कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र  दिले होते. आजपर्यंत इथल्या पंचक्रोषीतील लोकांच्या आरोग्याची काळजी या प्राथमिक आरोग्य केंद्राने घेतली असल्याचे सांगून त्यांनी स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. वर्षानुवर्ष आपण जो स्नेह जपला आहे त्याच्या कटिबध्दतेतून, कर्तव्य तत्परतेच्या भावनेतून हे भूमिपूजन करतांना मला विशेष आनंद असल्याचेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

रोहिपिंपळगांव येथील लोकसंख्या गेल्या 40 वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजेप्रमाणे हे  नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रही येणाऱ्या पिढ्यांच्याही आरोग्याची काळजी घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या भागातील रस्त्यांची दुर्दशा ही मोठ-मोठी अवजड वाहने व त्यांची वर्दळ अधिक असल्याने झाली आहे. या रस्त्यांसाठी प्रत्येक वेळी मी निधी उपलब्ध करुन देत आलो आहे. अंदुरा ते वसंतवाडी हा रस्ता देखील दीर्घकाळ टिकेल असा केला जाईल. नांदेड येथून बासरपर्यंत सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चाच्या सुमारे शंभर किलोमिटर रस्त्याला मी मंजूरी दिली आहे. येत्या काही दिवसात हे काम सुरू करू. आता बासर ते नांदेड हे अंतर केवळ एक ते दिड तासात पूर्ण करता येईल अशीही त्यांनी माहिती दिली. 

जिल्ह्यात सामाजिक न्यायाच्या दृष्टिने अनुसूचित जातीसाठी विविध विकास योजनांसमवेत वसतीतील सिंमेट रस्त्यांसाठी आपण सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातंर्गत या योजना राबविल्या जात आहेत. याचबरोबर जिल्ह्यात गोदावरी आणि उपनद्यांच्या बाजूने असलेल्या गावांना पादंण रस्त्यांची गंभीर समस्या असल्याचे मला माहित आहे. जवळपास 48 पादंण रस्ते मी मंजूर केल्याची माहितीही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. 

यावेळी विधान परिषद सदस्य अमर राजूरकर व पदाधिकाऱ्यांचेही समायोचित भाषणे झाली. यावेळी जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती, खोली बांधकाम, सभागृह, जाळरेषा तयार करणे, तळे करणे,  सीसी रस्ता, नाली बांधकाम, पाणीपुरवठा आदिंच्या कामांचे प्रातिनिधीक स्वरुपात भूमिपूजन केले. वसंतवाडी, येळेगाव, बामणी येथील विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी