तात्काळ मदत देण्याची गावकऱ्यांनी केली मागणी
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे वडगाव तांडा येथील एका शेतकरी कुटुंबाच्या घराला आग लागून तब्बल २ लक्ष ४१ हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे नुकसानग्रस्त कुटुंब उघड्यावर आले असून, शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त नागरिकास मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड - किनवट राष्ट्रीय महामार्गावर वडगाव तांडा येथे बंजारा समाजाची वस्ती आहे. सध्या कडक उन्हाळ्याची सुरुवात झाली असून, नेहमीप्रमाणे येथील रमेश सीताराम राठोड यांचे कुटुंब दिवसभर काम करून रात्रीला गाड झोपी गेले असता अचानक घराला आग लागली. हा प्रकार घराच्या पाठीमागे बाहेर झोपलेल्या लोकांच्या लक्षात आला. घरातून धूर येत असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने घरच्या लोकांना उठवून घरातून बाहेर काढले. यावेळी संपूर्ण गाव एकतर जमले होते या सर्वानी मिळून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तब्बल दोन तासानंतर आग विझविण्यास गावकर्यांना यश आले असून, हिमायतनगर येथून अग्निशमन बंब दाखल झाले. त्यांच्या सहाय्याने इतर आग विझविल्या गेली.
एकूणच वडगाव तांडा येथील आगीच्या या घटनेबाबत शेजारी व गावकऱ्यांनी सतर्कता दाखवीत तात्काळ घरच्यांना बाहेर काढून आग विझविली, म्हणून हि दुर्घटना टळली. अन्यथा येथे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली असती. मात्र या दुर्घटनेत राठोड कुटुंबियांचे नाटी, दरवाजे, टिनपत्रे, शेती पाईप, सोयाबीन, ३० क्विंटल चणा, तूर ५ क्विंटल, फुर्निचर, यश सर्व गृहउपयोगी साहित्य जाळून खाक झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच या भागाचे तलाठी यांनी तुकाराम मोतीराम राठोड, गंगाराम मारू जाधव, अंकुश अनिल राठोड, सहदेव वसंत जाधव, कैलास राठोड यांच्या उपस्थितीत आगीच्या घटनेत एकूण २ लक्ष ४१ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे. हि आग शॉर्टसर्किट होऊन लागली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी महावितरण कंपनीने नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.